पुणे- गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूच्या रुग्णांमध्ये जवळपास निम्म्याने घट झाली असून, त्याच्या चाचण्यांची संख्याही कमी झाली आहे.
पावसाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात शहरातील डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट होते. तरीही ताप आदी लक्षणे आढळल्यास चाचणी करून घ्या आणि विनाविलंब उपचार घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
“इडिस इजिप्त’ डासांपासून डेंग्यू होतो. हा डास शक्यतो दिवसा दंश करतो. बाधा झालेल्या व्यक्तीस डोकेदुखी, खूप ताप, पुरळ आणि सांधे आणि स्नायूंमध्ये वेदना असे या आजाराचे लक्षण आहे. याशिवाय थकवाही जाणवतो. डेंग्यू तापासाठी विविध प्लेटलेट मॉनिटरिंग करणे आवश्यक आहे, असे डॉक्टरांनी याबाबत माहिती देताना सांगितले.
डेंग्यू हा आजार सहसा पावसाळ्यात उद्भवतो आणि हिवाळ्यात त्याचे प्रमाण कमी होते. नोव्हेंबरपर्यंत सुमारे 30% पॉझिटिव्ह प्रकरणे नोंदवली गेली होती आणि आता डिसेंबरमध्ये ही संख्या 14% वर आली आहे. डेंग्यूच्या चाचण्यांची संख्या देखील कमी झाली आहे.
– डॉ. निरंजन नाईक, पॅथॉलॉजिस्ट
डेंग्यू आणि करोनाची लक्षणे ही जवळपास सारखीच आहेत. अनेक नागरिकांना थंडी, ताप, सर्दीच्या तक्रारी जाणवू लागल्या होत्या. परंतु, गेल्या दोन महिन्यांत आता शहरात डेंग्यू, मलेरियाचे प्रमाण कमी प्रमाणात दिसून येत आहे.
– डॉ. संजय नगरकर,
जनरल फिजिशियन
ही काळजी घ्या…
अशक्तपणा, रक्तस्त्राव, चक्कर येणे किंवा रक्तदाब कमी होण्याची चिन्हे आढळल्यास स्वतःची चाचणी करून घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय स्वत:हून कोणते औषध घेणे टाळा. डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, जाळी वापरा, पूर्ण बाह्यांचे कपडे घाला, घराजवळ पाणी साचू देऊ नये, घर-कार्यालयाचा परिसर स्वच्छ ठेवा, नियमित फवारणी करा. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार घ्यावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.