पावसाचा जोर ओसरला : पवना धरणातील पाणीसाठा 88.48 टक्क्यांवर
पिंपरी – गेल्या काही दिवसांमध्ये मावळातील धरणाच्या पाणलोट क्षेत्रात हलक्या सरी पडल्या असून, तालुक्यातील लोणावळा येथे 33.5 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाली आहे. गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून, पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पावसामुळे पवना धरणातील पाणीसाठा 88.48 टक्के एवढा झाला आहे. त्यामुळे मावळ आणि पिंपरी-चिंचवडकरांच्या पाण्याचा प्रश्न आता मिटणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
गेल्या 15 ते 20 दिवस पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच मावळ तालुक्यातील विविध भागात पावसाने चांगलीच हजेरी लावली. त्यामुळे भातपिकाला मोठा दिलासा मिळाला आहे. पिकांना पोषक पाऊस झाल्याने पिके चांगलीच तरारली आहेत. सध्या तूर, कापूस, बाजरी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तर बाजरी पिके कणसाच्या अवस्थेत आहेत. अति पावसामुळे मूग, उडीद पिकांचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. भात पिकांच्या लागवडी आटोपल्या असल्या तरी अनेक ठिकाणी भात पिके जोमात आहेत. काही ठिकाणी भात पिकांवर रोग, किडीचा प्रादुर्भाव होण्यास सुरुवात झाली आहे.
गेली चोवीस तासांत 19 मि.मी. पाऊस झाल्याची नोंद आहे. मावळ तालुक्यातील काले 12.5, कार्ला 24.3, खडकाळा 16.3, लोणावळा 33.5 मिलिमीटर पाऊस पडला. तर शिवणे वडगाव मावळ, तळेगाव येथे हलक्या सरी पडल्या. तर थेरगाव येथे पावसाचा शिडकावा झाला. गतवर्षी पवना धरणातील पाणीसाठा 100 टक्के एवढा होता. यंदा मात्र पावसाने ओढ दिल्याने आजमितीस धरणातील पाणीसाठा 88.48 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर 1 जूनपासून धरणाच्या पाणीसाठ्यात 52.66 टक्के वाढ झाली असून, गेल्या चोवीस तासांत पाणीसाठ्यात 2.2 टक्के वाढ झाली आहे.
वडिवळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूच
कामशेत -गेल्या काही दिवसांपासून नाणे मावळ परिसरात कोसळणाऱ्या संततधार पावसाने वडिवळे धरण 84.40 टक्के भरले. पाऊस सातत्याने सुरूच असल्याने धरण सुरक्षेसाठी आणि पूर पूरनियंत्रण करण्यासाठी धरणातून कुंडलिका नदीत मागील आठवड्यापासून पाण्याचा विसर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सध्या वडिवळे धरणातून कुंडलिका नदीत 100 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती धरणाचे अभियंता मनोहर खाडे यांनी दिली आहे.
मागील आठवड्यापासून वडिवळे धरणातून पावसाच्या प्रमाणानुसार शंभर ते अडीचशे क्यूसेकने पाण्याचा नियमितपणे विसर्ग सुरू आहे व हे प्रमाण कमी असल्याने नाणे मावळातील कुंडलिका नदीला अद्यापपर्यंत पूर आला नाही. मात्र पावसाचा जोर वाढल्यास पूरस्थिती निर्माण होऊ शकते.