नवी दिल्ली – भारतात वेगात शहरीकरण वाढत आहे. अशा परिस्थितीत शाश्वत विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून इलेक्ट्रिक हायवे उभारता येऊ शकतील का यावर उद्योग जगतासोबत चर्चा चालू असल्याचे केंद्रीय रस्ते व्हावे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक हायवे परवडणारे असले पाहिजे. अन्यथा त्याचा काही उपयोग होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय उद्योग महासंघाने या विषयावर आयोजित केलेल्या चर्चेत बोलतांना गडकरी यांनी सांगितले की, भारतात पर्यावरण संतुलनासाठी शाश्वत विकासावर भर देण्याची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून वाहतुकीसह इतर सर्व क्षेत्रात अक्षय ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
त्याचाच एक भाग म्हणून परवडणारे इलेक्ट्रिक हायवे उभारता येऊ शकतील का यावर सध्या चर्चा चालू असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील शहरीकरण वेगाने वाढत आहे. सध्या आहे ती शहरे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. बंगळुरू शहरात रस्ता वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून तेथील लोकांना कार्यालयात कामाला जाता येत नाही. हा प्रकार थांबण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
जर अक्षय ऊर्जेचा वापर विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणा प्रमाणात झाला नाही तर त्यामुळे प्रश्न सुटण्याऐवजी वाढत जाणार आहेत. यासाठी विविध उद्योगांनी अक्षय उर्जेचा वापर करण्यावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आपण या संदर्भात भारतातील विविध उद्योगांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर चर्चा करत असल्याचे स्पष्ट केले.