राज ठाकरेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र
दारुची दुकाने, हॉटेल्स किचन सेवा सुरु करण्याची मागणी
मुंबई : राज्यात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बंद करण्यात आलेली दारुची दुकाने सुरु करण्याची मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे. राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने वाईन शॉप्स सुरु करायला काय हरकत आहे? असा सवालही त्यांनी पत्रातून केला आहे. तसेच केंद्राच्या मदत येईल तेव्हा येईल पण त्या मदतीची वाट न पाहता आपणच आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे मार्ग शोधण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
राज ठाकरे यांनी पत्रात नमूद केले आहे की, पार खडखडाट झालेल्या राज्याच्या तिजोरीत आता महसुलाची काही प्रमाणात आवक सुरु व्हावीच लागेल. जवळपास 18 मार्चपासून राज्य टाळेबंदीत आहे. अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील याची खात्री नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
आधी राज्यात दारूबंदी होती आणि आता ती महसुलासाठी उठवा असे कोणी म्हणत नाही.
टाळेबंदीच्या आधी दारूची दुकाने सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. बाकी जे या दुकानांमध्ये जातील त्यांना शारीरिक अंतर राखून खरेदी करायला लावणं इत्यादी गोष्टींसाठी कडक निकष लावता येतीलच, असेही त्यांनी म्हटले आहे.
वाईन शॉप्स सुरु करा याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा, असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे.
राज्यातील पेट्रोल पंप, जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत. दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला 41.66 कोटी, महिन्याला 1250 कोटी आणि वर्षाला 15000 कोटी मिळतात. आता जवळपास राज्य 35 दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील याचा अंदाज नाही. यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू याचा अंदाज येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे गरजेचे
एक एक गोष्टी हळूहळू सुरू करत राज्याचे अर्थचक्र सुरू करून द्यायला पाहिजे. या रोगाचा सामना करण्यासाठी लोक सहकार्य करतीलच परंतु आपल्यालाही त्यांचं जगणं सुसह्य व्हावं याचा विचार करायला हवा आहे. हा प्रश्न फक्त महाराष्ट्राचा नव्हे तर देशातील इतर राज्यांनी देखील याचा विचार करावा. केंद्र सरकारकडून मदत येईल तेव्हा येईल, ती किती येईल हे माहित नाही तेव्हा आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्याचे यासारखे मार्ग शोधण्याशिवाय पर्याय नाही, असे राज यांनी पत्रात नमूद केले आहे.