नागठाणे (प्रतिनिधी) – अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरवातीच्या काळात महावितरणच्या थकीत वीज बिल वसुलीसाठी ग्राहकांची कनेक्शन्स तोडू नयेत, असा आदेश उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी दिला होता; परंतु थकबाकीदार वीजग्राहकांना मिळालेला दिलासा क्षणभंगूर ठरला आहे.
याच अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंत्र्यांनी थकबाकीदारांची वीज कनेक्शन्स तोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर महावितरणने ग्रामीण भागातील थकाबाकीदारांची कनेक्शन तोडायला तात्काळ सुरुवात केली. त्यामुळे ग्राहकांची धावपळ उडाली असून, अनेक ठिकाणी ग्राहक महावितरणच्या कर्मचाऱ्यां -बरोबर वाद घालताना दिसत आहेत.
करोना काळातील वाढीव वीज बिलांमुळे ग्राहकांमध्ये असंतोष आहे. त्या काळातील असंख्य बिले अजूनही थकीत आहेत. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी करोना काळातील वीज बिले माफ होतील, असे जाहीर केले होते; परंतु काही दिवसांतच त्यांनी “यू टर्न’ घेतला. त्यामुळे वीज ग्राहक संभ्रमावस्थेत होते. वीज बिले भरावीत की, ती माफ होणार, अशा पेचात सापडलेल्या ग्राहकांची बिले फुगली. त्यांच्यात असंतोष असताना विरोधी पक्ष, विविध संघटनांनी करोना काळातील वीज बिलमाफीसाठी आंदोलने केली होती.
अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा मुद्दा चर्चेत आल्यानंतर थकबाकी वसुलीसाठी ग्राहकांची वीज कनेक्शन्स तोडू नयेत, असा आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला होता; परंतुअधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जामंत्र्यांनी थकबाकीदारांची कनेक्शन्स तोडण्याचा निर्णय जाहीर केला. त्याची अंमलबजावणी महावितरणने तात्काळ सुरू केली आहे. काही ग्राहकांची वीज कनेक्शन्स तोडण्यातही आली असून, अनेक ठिकाणी ग्राहक आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादी होत आहे.