नवी दिल्ली, दि. 7 – नुकत्याच संपलेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसची कामगिरी अतिशय निराशाजनक झाली असून पक्षाच्या खासदारांनी यापासून प्रामाणिकपणाने काहीं धडा घेतला पाहिजे, अशी सूचना कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे.
पक्षाच्या संसदीय समितीच्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरिसंगद्वारे त्यांनी संबोधित केले त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारीणीची बैठक लवकरच होईल त्यात या निकालाचा आढावा घेतला जाईल. तथापि या निवडणुकीत आपल्याला अपेक्षित यश मिळाले नाहीं ही वस्तुस्थिती आहे. हे निराशानजनक आणि अनपेक्षित आहे.
यावेळी सोनिया गांधी यांनी या निवडणुकीतील यशाबद्दल ममता बॅनर्जी, एमके स्टॅलिन आणि मार्क्सवाद्यांचेही केरळातील विजयाबद्दल अभिनंदन केले. कॉंग्रेसला या निवडणुकीत आसाम आणि केरळात सत्ता मिळवता आली नाही. पश्चिम बंगालमध्ये पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही तथापि कॉंग्रेसने द्रमुकच्या साथीने तामिळनाडूत मात्र सत्तासंपादन केली आहे.