नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) चेअरमन होण्याची जोरदार चर्चा सुरू झाली असतानाच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांकडून त्यावर थेट भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र कॉंग्रेसने त्यावर थेट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पवारांना यूपीएचे चेअरमन करण्याच्या चर्चेत काहीच तथ्य नसल्याचं कॉंग्रेसने स्पष्ट केलं आहे.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तारीक अन्वर यांनी एका वाहिनीशी बोलताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. जाणूनबुजून अशा गोष्टी पेरल्या जात आहेत. शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. त्यांच्यामध्ये संभ्रम निर्माण व्हावा म्हणून या वावड्या उठवण्यात आल्या आहेत. पंरतु, वास्तवाशी या बातमीचा काहीच संबंध नाही. या बातमीत काहीच तथ्य नाही, असे अन्वर यांनी म्हटले आहे.
तसेच खुद्द पवारांनाही अशा प्रकारची चर्चा सुरू असल्याचं माहीत नसेल, असा दावा त्यांनी केला आहे. यूपीएचा अध्यक्ष हा सर्वात मोठ्या पक्षातूनच होत असतो. कॉंग्रेस जेव्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला होता, तेव्हा यूपीएची स्थापना झाली होती.
आजही कॉंग्रेसच सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षांमध्ये कॉंग्रेसकडे खासदारांचं सर्वाधिक बळ आहे. त्यामुळे यूपीएचा अध्यक्षही कॉंग्रेसमधूनच होईल यात शंका नाही. आता ज्या पद्धतीने बातम्या सुरू आहेत, त्या आम्ही नाकारत आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, राष्ट्रवादीने सावध प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आजच्या घडीला राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकजूट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने मी काम करत आहे, असं शरद पवार यांनी आधीच सांगितलं होतं. विरोधकांचा नेता कोण होईल, हा प्रश्न नाही, तर आधी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे.
केंद्र सरकारच्या विरोधात वातावरण आहे, जनता कंटाळलेली आहे. मजूर, शेतकरी यांच्यामध्ये सरकारविरोधात रोष आहे, त्यामुळे विरोधक एकजूट झाले आणि मतविभाजन टाळलं तर सत्ता परिवर्तन निश्चित आहे. त्या दिशेने शरद पवारांचं काम सुरु आहे असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं.
तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र या चर्चेवर टीका केली आहे. पवारांकडे यूपीएचं नेतृत्व जाणं म्हणजे सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवण्यासारखं आहे, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.