पुणे -केंद्र शासनाने महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न याबाबत चुकीची धोरणे आणली आहेत. महागाई वाढवून या शासनाने नागरिकांचे खिपे कापण्याचे काम केले आहे. या
धोरणांविरुद्ध राज्यात कॉंग्रेस मोठे आंदोलन उभे करणार आहे, अशी घोषणा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केली. पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त पटोले आले होते.
केंद्र शासनाने आधी पेट्रोल, डीझेल, गॅसच्या दरात भरमसाठ वाढ केली. यातून कृत्रिम महागाईच वाढवली. याविरुद्ध कॉंग्रेसने आवाज उठवल्यानंतर काहीचे दर कमी करण्यात आले आहेत.
राज्यातही देवेंद्र फडणवीस सरकारच्या कालावधीतच विविध करांत वाढ झालेली आहे. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यापासून दोन वर्षांत पेट्रोलमध्ये केवळ प्रति लिटरला एक रुपये वाढ केली आहे.
महागाईच्या काळात राज्य शासनाने पेट्रोलचे दर कमी करुन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे, असेही पटोले यांनी सांगितले. मात्र, दर किती कमी करावेत याबाबत ठोस भाष्य करण्यास त्यांनी टाळाटाळ केली.
भाजपचे नेते किरीट सोमय्या हे महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील लक्ष विचलित व्हावे म्हणून काहीही प्रकरणे काढून खोटेनाटे आरोप करुन मनोरंजनच करत आहेत. त्यांना एकाही प्रकरणात यश मिळालेले नाही. जनताही आता त्याचा विरोध करू लागली आहे, असे मत पटोले यांनी व्यक्त केले.
एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडवावेत
एस.टी. कर्मचाऱ्यांनी विविध प्रश्नांसाठी संप केला आहे. यामुळे प्रवाशांनाही त्रासाला सामोरे जावे लागत आहे. शासनाने एस.टी. कामगारांचे प्रश्न सोडवावेत असा कॉंग्रेसचाही आग्रह आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कोणत्याही प्रश्नांवरुन राज्यात उलथापालथ करण्याचे राजकारण करणेही चुकीचे असल्याचे पटोले म्हणाले.