नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारुण पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली. शनिवारी नवी दिल्ली येथे झालेल्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल यांनी हाच मुद्दा उपस्थित केला. परंतु कॉंग्रेस कार्यकारिणीने राहुल यांना राजीनामा न देण्याचा सल्ला दिला. याबाबत माजी वित्त मंत्री आणि कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले की, राहुल यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊ नये. तसे केल्यास दक्षिण भारतातील कॉंग्रेस कार्यकर्ते आत्महत्या करतील.
कॉंग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत सर्व कॉंग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या राजीनाम्याला जोरदार विरोधही केला. राहुल यांनी अध्यक्षपदावर कायम रहावे, अशी विनंतीदेखील केली. नेत्यांच्या विरोधानंतरही राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी गांधी घराण्यापलीकडचा माणूस हवा. मी कॉंग्रेससाठी सैनिकासारखं, एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणे काम करत राहीन, असे वक्तव्यही राहुल गांधींनी बैठकीत केल्याचे समोर आले आहे.
राहुल गांधींच्या नेतृत्वावर सर्वांनी विश्वास दाखवला असला तरी त्यांच्या ऑफिसच्या कार्यशैलीबाबत मात्र काहींनी नाराजी व्यक्त केली. निखिल अल्वा, के. राजू, संदीप सिंह यांच्यासारखे राहुल यांचे अनेक सहकारी हे डाव्यांच्या प्रभावाखाली आहेत. त्यामुळे पक्षाची दिशा चुकत असल्याचा अनेकांचा आरोप होता.
दरम्यान, निवडणुकीतील पराभवानंतर गांधी कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीने राजीनामा सादर करायचा, आणि त्यानंतर कॉंग्रेस वर्किंग कमिटीने तो नाकारायचा, असे नाट्य याहीआधी घडलेले आहे. त्यामुळे आज त्याचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली. सलग दोन मानहानीकारक पराभवानंतर कॉंग्रेस पक्ष आता स्वतःच्या कार्यशैलीबद्दल गांभीर्याने विचार करणार का? नव्या पुनर्ररचनेत राहुल गांधी काही धाडसी निर्णय घेणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे.