श्रीगोंदा – कॉंग्रेस पक्ष सध्या अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. मात्र, आता राज्यातच नव्हे तर सबंध देशातील वातावरण बदलत आहे. अशा वातावरणात कार्यकर्ते अधिक ताकदीने लढल्यास कॉंग्रेस लवकरच दिमाखात उभी राहील, असा विश्वास कॉंग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
कॉंग्रेसच्या प्रभारी जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल आ. थोरात यांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार मोहन जोशी होते. आमदार रवींद्र धंगेकर, आमदार लहू कानडे, ज्येष्ठ बाबासाहेब भोस, हेमंत ओगले, अनुराधा नागवडे, उत्कर्षा रुपवते, संपतराव म्हस्के, नगराध्यक्षा शुभांगी पोटे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मोहन जोशी म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली नगर जिल्ह्यात कॉंग्रेस नव्याने भरारी घेईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्यादृष्टीने कार्यकर्त्यांनी ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन केले.
आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, आ. बाळासाहेब थोरात यांच्यामुळे मला विधानसभेत काम करण्याची संधी मिळाली. थोरात आणि नागवडे कुटुंबाचे दोन पिढ्यांचे ऋणानुबंध आहेत. ते माझ्याप्रमाणेच नागवडे कुटुंबाला देखील ताकद देतील, असा विश्वास व्यक्त केला.
कॉंग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे म्हणाले, पक्षाने दिलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना पक्षावाढीसाठी जिल्ह्यात ताकदीने काम करू. सरकारच्या दडपशाहीमुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजपच्या जातीयवादी राजकारणाविरोधात जिल्ह्यात लढा उभा करू. प्रा. शंकर गवते यांनी सूत्रसंचालन तर युवकचे जिल्हाध्यक्ष स्मितल वाबळे यांनी आभार मानले.
नागवडेंच्या उमेदवारीला थोरातांचा “ग्रीन सिग्नल’!
अनुराधा नागवडे येणारी विधानसभा निवडणूक लढविणारच, अशी घोषणा राजेंद्र नागवडे यांनी केली. त्यावर अनुराधा तालुका सांभाळतील, राजेंद्र तुम्ही जिल्हा सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो, असे सांगत आ. थोरात यांनी अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीला एकप्रकारे “ग्रीन सिग्नल’च दिला.
श्रीगोंद्याची जागा कॉंग्रेसला घ्या – काकडे
कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदांची जबाबदारी देत पक्षाने नागवडे कुटुंबाला मोठी ताकद दिली आहे. आता महाविकास आघाडीत राष्ट्रवादीकडील श्रीगोंद्याची विधानसभेची जागा कॉंग्रेसकडे घ्या, अशी मागणी तालुकाध्यक्ष प्रा. धर्मनाथ काकडे यांनी केली.