नवी दिल्ली – पुन्हा उभारी घेण्याचा निर्धार करणाऱ्या कॉंग्रेसमधील गळतीसत्र कायम आहे. पंजाबमधील ज्येष्ठ नेते सुनील जाखड आणि गुजरातमधील तरूण नेते हार्दिक पटेल यांच्यामुळे कॉंग्रेसमधील आऊटगोईंग सुरूच राहिले आहे.
भाजपने 2014 मधील लोकसभा निवडणुकीत बाजी मारून केंद्राची सत्ता मिळवली. तेव्हापासून काही अपवाद वगळता विविध निवडणुकांत भाजपच्या विजयाची घोडदौड सुरूच आहे. त्याउलट, कॉंग्रेसला राजकीय घसरण अनुभवावी लागत आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये अस्वस्थता वाढीस लागल्याचे चित्र आहे. परिणामस्वरूप, अनेक महत्वाचे नेते कॉंग्रेसचा हात सोडत आहेत. याआधी ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, सुश्मिता देव, पी.सी.चाको, अश्वनी कुमार, आर.पी.एन.सिंह, रिपून बोरा आदी बडे नेते कॉंग्रेसमधून बाहेर पडले. आऊटगोईंगच्या त्या यादीत जाखड आणि हार्दिक यांच्यामुळे भरच पडली आहे.
कॉंग्रेसने पुन्हा उभारी घेण्यासाठी पक्ष संघटनेत व्यापक फेरबदल करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, अस्वस्थ, असंतुष्ट नेत्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न पक्षाकडून केले जात नसल्याचे सूचित होत आहे. उलट, असंतुष्टांबाबत पक्षाने काहीसा आक्रमक पवित्रा स्वीकारल्याचेच दिसते. भाजपच्या दबावापुढे झुकणाऱ्यांना कॉंग्रेस सोडून जाण्याचा मार्ग मोकळा आहे, अशी कठोर भूमिका पक्षाचे नेते राहुल गांधी सातत्याने मांडत आहेत.
कुलदीप बिष्णोई भाजपच्या वाटेवर?
कॉंग्रेसने अलिकडेच हरियाणा शाखेची फेररचना केली. मात्र, त्या प्रक्रियेत डावलण्यात आल्याने माजी मुख्यमंत्री भजन लाल यांचे आमदारपुत्र कुलदीप बिष्णोई नाराज आहेत. अशात त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची भेट घेतली. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.