नवी दिल्ली – कॉंग्रेस मध्ये राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांमध्ये झालेल्या बैठकीनंतर आता कॉंग्रेसने संघटनात्मक फेरबदलांना प्रारंभ केला असून येत्या काही दिवसांत महाराष्ट्रासह तेलंगणा, गुजरात आणि मध्यप्रदेश या राज्यांमध्ये फेरबदल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे राज्याचा महसुल मंत्रालयाचाही कारभार आहे. त्यांच्या ऐवजी दुसरा प्रदेशाध्यक्ष नेमला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कालच मुंबई प्रदेश कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातही कमलनाथ यांच्याकडे विधीमंडळ कॉंग्रेस नेतेपदासह प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार आहे तेथेही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेस मध्ये संघटनात्मक फेरबदल करून नंतर राष्ट्रीय अध्यक्ष व कार्यकारीणीची निवड केली जाण्याची शक्यता आहे.
जानेवारी महिन्यात ही बदलाची प्रक्रिया पुर्ण होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी राहुल गांधी यांचीच फेरनिवड होण्याची शक्यता वर्तवली जात असून कालच स्वता राहुल गांधी यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचे संकेत दिले आहेत.
अंतरीम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आसाम आणि केरळ या राज्यांसाठी तीन सेक्रेटरींचीही नियुक्ती केली आहे. या दोन राज्यांसाठी जे कॉंग्रेसचे प्रभारी नियुक्त आहेत त्यांना सहाय्य करण्याचे काम हे सेक्रेटरी करणार आहेत. सध्या आसामचे प्रभारी म्हणून जितेंद्रसिंह आणि केरळचे प्रभारी म्हणून तारीक अन्वर हे काम करीत आहेत.