नवी दिल्ली – कर्नाटक निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर कॉंग्रेसमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आता आगामी निवडणुकीतही कॉंग्रेस चांगली कामगिरी करण्याच्या तयारीत आहे. दरम्यान, कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा संदर्भ देत म्हटले की, आम्ही कर्नाटकात जे केले, त्याचीच आम्ही मध्य प्रदेशात पुनरावृत्ती करणार आहोत, यावेळी कॉंग्रेसला मध्य प्रदेशात 150 जागा मिळतील.
कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सरचिटणीस केसी वेणुगोपाल आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात मध्य प्रदेशातील पक्ष नेत्यांची बैठक घेतली. ज्यामध्ये प्रदेशाध्यक्ष कमलनाथ, दिग्विजय सिंह आणि इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर राहुल गांधी म्हणाले, “आमची दीर्घ चर्चा झाली, आमचे अंतर्गत मूल्यांकन असे आहे की, आम्हाला कर्नाटकात 136 जागा मिळाल्या, तर मध्य प्रदेशात आम्हाला 150 जागा मिळणार आहेत.
दिल्लीतील कॉंग्रेस मुख्यालयात पक्षाध्यक्ष आणि इतर नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे पक्षप्रमुख कमलनाथ म्हणाले की, नुकतीच एक अतिशय महत्त्वाची बैठक झाली. त्यानुसार पक्षनेते राहुल गांधी यांच्या निर्धारानुसार आम्ही मध्यप्रदेशात 150 जागा मिळवून बहुमताचे सरकार स्थापन करु.
यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी म्हटले आहे की, कॉंग्रेसचा “खयाली पुलाव’ मनाला आनंद देण्यासाठी चांगला आहे. भारतीय जनता पक्ष मध्य प्रदेशात 200 हून अधिक जागा जिंकेल. आता तुम्हाला खयाली पुलाव शिजवायचा असेल तर शिजवत राहा.