मुंबई – येत्या फेब्रुवारीत मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्यापार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कॉंग्रेसनेही निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. कॉंग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप यांनी तर कॉंग्रेस महापालिकेच्या सर्वच्या सर्व 227 जागांवर उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
भाई जगताप यांच्या उपस्थितीत आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस पक्षाची जिल्हा स्तरीय बैठक आज संपन्न झाली. यावेळी मुंबई महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अजंता यादव आणि पालकमंत्री अस्लम शेखही उपस्थित होते. यावेळी भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीचं गणित, निवडणुकीचा आराखडा समजावून सांगितला. तसेच मुंबई जिंकण्यासाठी नेते आणि कार्यकर्त्यांनी काय केले पाहिजे याच्या सूचनाही दिल्या. यावेळी त्यांनी आम्ही 227 जागा लढण्यावर ठाम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबई महापालिका लागली निवडणुकीच्या कामाला लागली आहे. मुंबईतील प्रत्येक वॉर्डात वस्ती, झोपडपट्टी, इमारती याचा आढावा घेण्याचे प्रत्येक सहाय्यक आयुक्तांना आयुक्तांनी आदेश दिले आहेत. महापालिका 227 वॉर्डांचा कच्चा आराखडा तयार करणार आहे. तसेच निवडणूक आयोगाने माहिती मागवली तर ती दिली जाणार आहे. मुंबईत कॉग्रेसकडून 40 ते 45 वॉर्डच्या पुनर्रचनेची मागणी केली आहे. कॉंग्रेसची ही मागणी पूर्ण केली जातेय का हे बघावं लागणार आहे.