पिंपरी – शहरातील तीनही मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आघाडीच्या वतीने निवडणूक लढविणार असल्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले. यामुळे शहरातील कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद निर्माण झाली असून सोशल मीडियावर आतापासूनच संतापाची लाट निर्माण झाली आहे. कॉंग्रेसची मते हवीत, मग उमेदवार का नको, असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. तसेच किमान एकतरी मतदारसंघ कॉंग्रेसला न दिल्यास बंडखोरी अटळ असल्याचा इशाराही दिला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्याने दोन्ही पक्षाचा एकही आमदार शहरातून निवडून आला नाही. महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 36 नगरसेवक निवडून आले तर दुसरीकडे कॉंग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. यामुळे कॉंग्रेसचे शहरातील अस्तित्व धोक्यात आले होते. जर विधानसभा निवडणुकीत एकही जागा कॉंग्रेसला दिली नाही तर शहरातील कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्टात येईल, अशी भीती ज्येष्ठ कार्यकर्त्यांना वाटत आहे.
काळेवाडी येथे रविवारी झालेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहरातील तीनही मतदारसंघात आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार असल्याचे घोषित केले. या घोषणेचे तीव्र पडसाद कॉंग्रेसच्या गोटात उमटले आहेत.
सोशल मीडियावर कार्यकर्त्यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी फक्त घड्याळ घेऊन फिरायचे काय, पक्षश्रेष्ठी काय करीत आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता अशा प्रकारे निर्णय कसा काय घेतात, असा प्रश्न काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. शहरातील एकही जागा कॉंग्रेसला न दिल्यास आम्ही काम करणार नाही, अशी भूमिका कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. याबाबत बोलताना एनएसयूआयचे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे म्हणाले, किमान एक मतदार संघ कॉंग्रेसला मिळणे आवश्यक आहे. जर असे केले नाही तर बंडखोरी अटळ असून त्याचा फटका राष्ट्रवादीला बसल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही- साठे
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शहरातील तीनही विधानसभेच्या जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही. कॉंग्रेसच्या नेत्यांनी याबाबत आम्हाला काहीही सांगितलेले नाही. शहरातील एकतरी जागा कॉंग्रेसला मिळालीच पाहिजे. याबाबत राष्ट्रवादीनेही सकारात्मक विचार करावा, यातच आघाडीचा फायदा आहे.