मुंबई – राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रसार, लॉक डाऊनमुळे निर्माण झालेली आर्थिक चणचण आणि वाढती उष्णता यांमुळे राज्यातील जनता हैराण झाली असतानाच दुसरीकडे या संकटाच्या काळातही राजकीय पटलावर मात्र मोठे उलटफेर होण्याची चिन्ह आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असं की, राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी स्थापण्यामध्ये अग्रणी भूमिका असलेल्या शरद पवार यांनी काल राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यानंतर आज शरद पवार यांनी मातोश्रीची पायरी चढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे पवार-ठाकरे-राऊत यांच्या दरम्यान झालेल्या या बैठकीमध्ये काँग्रेसचे नेते मात्र उपस्थित नव्हते. पवारांच्या या मातोश्रीवरील बैठकीमुळे काँग्रेस नेते नाराज असल्याचेही वृत्त होते. मात्र काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे सांगत काँग्रेसच्या नाराजीबाबतचे वृत्त खंडित केले.
याबाबत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी, “राज्यातील महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची दर आठवड्याला बैठक होत असते. या बैठकीमध्ये सर्व निर्णय घेतले जातात. आम्ही सर्व एकत्र काम करत आहोत.” असं उत्तर दिलं. थोरात यांनी काँग्रेस नाराज नसल्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं असलं तरी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीला काँग्रेसच्या एकाही नेत्याची उपस्थित का नव्हती? हा प्रश्न अनुत्तरितचं राहतो.
Congress is not unhappy. All the three parties hold meetings every week where decisions are taken. All parties are working together: Balasaheb Thorat,Maharashtra Congress chief&Minister on being asked ‘if Congress is unhappy with Sharad Pawar’s meeting with CM Uddhav Thackeray’ pic.twitter.com/JHS6kB9p53
— ANI (@ANI) May 26, 2020