मुंबई – महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत त्यांच्याकडे राजकारणातून निवृत्त होऊन उर्वरीत काळ मनन चिंतनात घालवण्याचा आपला इरादा व्यक्त केला आहे. राजभवनाकडून त्यांच्यावतीने आज एक निवेदन जारी करण्यात आले असून त्यांचे हे निवेदन म्हणजे राज्यपालपदाचा त्यांनी थेट राजीनामाच दिला असल्याचे संकेत मानले जात आहेत.
राज्यपाल कोश्यारींच्या राजीनाम्याच्या संकेतानुसार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की,
“राज्यपाल भवन हे भाजप भवन झालेलं आहे, असा आक्षेप काँग्रेसचा होता. राज्यपाल हे महामहीम राष्ट्रपतींशी निगडीत असतात. त्यांना राजीनामा द्यायचा असता तर त्यांनी आपलं म्हणणं राष्ट्रपतींकडे पाठवायला हवं होतं. म्हणजे आमचा जो आक्षेप होता तो बरोबर होता”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.
#Maharashtra : राज्यपाल कोश्यारींचे राजीनाम्याचे संकेत; मोदींकडे व्यक्त केला निवृत्तींचा मानस
पटोले पुढे म्हणाले की, “राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सातत्याने महाराष्ट्रविरोधी भूमिका घेतली. तसेच संविधानिक व्यवस्थेचा अपमान आणि महापुरुषांबाबत सातत्याने वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. राज्यपाल भवन हे भाजप भवन झाले होते, असे चित्र दिसत होते.
राष्ट्रपतींकडे देखील आम्ही लेखी तक्रारी केल्या होत्या. परंतु, भाजपलाच त्यांची भूमिका अपेक्षित होती की काय असे वाटते. कारण अनेक वेळा लेखी मागणी करून देखील त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नव्हती. राज्यपाल हे उद्या जाण्याऐवजी आजच जावेत अशी आमची मागणी आहे. “