नवी दिल्ली: करोना फैलावावरून कॉंग्रेसकडून क्षुद्र राजकारण सुरू आहे. राष्ट्रहिताचा विचार करून कॉंग्रेसने जनतेची दिशाभूल थांबवावी, असा पलटवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला.
कॉंग्रेस कार्यकारिणी बैठकीत त्या पक्षाच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. त्याला शहा यांनी ट्विटरवरून प्रत्युत्तर दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देत असलेल्या करोनाविरोधी लढ्याचे कौतुक जगभरातून होत आहे. करोनाला हरवण्यासाठी 130 कोटी भारतीयांनी एकजूट केली आहे, असे शहा यांनी म्हटले. भाजपचे आणखी एक केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही प्रतिक्रिया दिली. कॉंग्रेसकडून केली जाणारी टीका दुर्दैवी आहे. करोनाविरोधात एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. करोनावर मात केल्यानंतर राजकारण करण्यासाठी वेळ मिळेलच, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.