नवी दिल्ली – लसीकरणाच्या प्रक्रियेत बदल करण्यात यावा, तसेच संपूर्ण देशात लसीची किंमत समान असावी, असे आवाहन कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांना केले आहे. तसेच केंद्र सरकारने 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांना मोफत लस देण्याची आपली जबाबदारी झटकल्याची टीकाही सोनिया गांधी यांनी केली आहे.
देशातील नागरिकांना लसीकरणासाठी जास्तीची किंमत मोजावी लागेल. राज्य सरकारांवरही त्याचा बोजा पडेल. देश संकटात असताना कोणतेही सरकार लोकांना त्रास देत नफेखोरीसाठी कशी काय मुभा देऊ शकते असा सवालही सोनिया गांधी यांनी आपल्या पत्रातून विचारला आहे. सरकारने लसीकरणाच्या प्रक्रियेचा पुनर्विचार करायला हवा. संपूर्ण देशात लसीची समान किंमत असावी, अशी मागणी त्यांनी केली.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने लशीची नवीन किंमत निश्चित केली आहे. राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली आहे. जगातील इतर कोणत्याही लसींच्या किमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असे कंपनीने म्हटले आहे त्या पार्श्वभूमीवर सोनियांनी ही मागणी पत्राद्वारे केली आहे.