नवी दिल्ली – पादत्राणे आणि खाद्यपदार्थ वितरणासह अनेक वस्तू आणि सेवांवरील जीएसटी वाढवल्याबद्दल काँग्रेसने शनिवारी मोदी सरकारवर निशाणा साधला. महागाईला आळा घालण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहन पक्षातर्फे मतदारांना करण्यात आले.
दिल्लीत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, हिमाचल आणि इतर काही राज्यांतील पोटनिवडणुकीत पराभव झाल्यानंतर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केले आहे. कमी दरात जीएसटी प्रणाली आणण्यासाठी मतदारांनी हुशारीने मतदान करावे. भाजपचा पराभव करावा, असे सुरजेवाला म्हणाले.
कपड्यांवरील जीएसटी न वाढवण्याचे श्रेय काँग्रेसला –
सुरजेवाला यांनी शुक्रवारच्या तातडीच्या बैठकीत कपड्यांवरील जीएसटी 5 टक्क्यांवरून 12 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा जीएसटी कौन्सिलचा निर्णय लांबणीवर टाकल्याचे श्रेय काँग्रेसला देण्याचा प्रयत्न केला. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आल्यानंतर कराचे दर वाढवले जातील, असा दावाही त्यांनी केला. कपड्यांवरील जीएसटी वाढवण्याचा निर्णय मागे घेण्यात आलेला नसून तो पुढे ढकलण्यात आला आहे, हे लक्षात ठेवा, निवडणुकीपर्यंत हा निर्णय पुढे ढकलण्यात आला असून, निवडणुका झाल्या की करवाढ केली जाईल, त्यामुळे भाजपचा पराभव करणे महत्वाचे आहे, असेही सुरजेवाला म्हणाले.
2014 नंतर मीठही महाग झालं –
जीएसटी दरात वाढ झाल्यामुळे पादत्राणे, टॅक्सी आणि ऑटो-रिक्षा भाडे, फूड डिलिव्हरी, अॅपद्वारे अन्न ऑर्डर करणे, एटीएममधून पैसे काढणे 1 जानेवारीपासून महाग होणार असल्याचेही काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले. सुरजेवाला यांनी दावा केला की, 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यापासून चहापत्ती, डाळी, स्वयंपाकाचे तेल, स्वयंपाकाचा गॅस आणि मीठही महाग झाले आहे.
मोदी आणि महागाई देशासाठी घातक –
‘मोदी असतील तर महागाई आहे, मोदी आणि महागाई देशासाठी घातक आहे, हे लक्षात ठेवा’, असे काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी खास पाच राज्यांतील मतदारांना सांगितले. यासोबतच आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्याचे आवाहनही त्यांनी केले. ते म्हणाले की, सरकार अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी कर वाढवते, जेणेकरून नंतर ते करमुक्त बजेट सादर करण्याचा दावा करू शकेल.