नवी दिल्ली – भाजपविरोधात एकवटण्याची गरज आहे. त्यासाठी प्रादेशिक पक्षांनी कॉंग्रेस आणि डाव्या पक्षांशी हातमिळवणी करावी. कॉंग्रेसने राष्ट्रीय स्तरावर तामीळनाडूसारखी इतर पक्षांशी तात्विक मैत्री करावी, असे आवाहन त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी शुक्रवारी केले.
मागील वर्षी तामीळनाडूत झालेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकच्या नेतृत्वाखालील आघाडीने घवघवीत यश मिळवले. त्या आघाडीचा कॉंग्रेस घटक आहे. त्याचा संदर्भ घेऊन स्टॅलिन यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीवेळी राष्ट्रीय पातळीवर विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज व्यक्त केली.
भारताची लोकशाही, संघराज्यीय रचना, विविधता, धर्मनिरपेक्षता, समता यांचे जतन करण्यासाठी राजकीय मानसिकता बाजूला ठेऊन एकवटायला हवे. एकी हे बळ असल्याची जाणीव सर्व विरोधी पक्षांनी ठेवावी. देश वाचवण्यासाठी एकत्र यावे, असे त्यांनी म्हटले.
भाजपच्या विरोधात राष्ट्रीय स्तरावर आघाडी उभी करण्यासाठी कॉंग्रेसला असलेले महत्व स्टॅलिन यांनी पुन्हा अधोरेखित केले. सर्व राज्यांत आघाड्या स्थापन करण्यावर कॉंग्रेसने भर द्यावा, असेही त्यांनी सुचवले.