नवी दिल्ली – कॉंग्रेस सत्तेवर आल्यास जम्मू काश्मीर मध्ये कलम 370 पुन्हा प्रस्थापित करण्याच्या विषयाचा फेर आढावा घेण्यात येईल असे जे विधान कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजयसिंह यांनी केले आहे.
त्याविषयी कॉंग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज पुन्हा एकदा केली आहे. या विषयावर गप्प राहण्याची मुदत आता संपली आहे अशी टिपण्णीही त्यांनी कॉंग्रेसला उद्देशून केली आहे.
दिग्विजयसिंह यांनी हे आक्षेपार्ह व देशविरोधी विधान करून आता एक दिवस उलटून गेला आहे. पण त्यावर कॉंग्रेस मात्र मूग गिळून गप्प आहे. दिग्विजयसिंह यांची ही भूमिका कॉंग्रेसलाही मान्य आहे असा याचा अर्थ काढायचा काय असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
एका कार्यक्रमात पाकिस्तानी पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिग्विजयसिंह यांनी हे विधान केले होते तेव्हापासून भाजपचे नेते कॉंग्रेसवर सतत टिका करीत आहेत, पण त्याला कॉंग्रेसने मात्र अजून उत्तर दिलेले नाही.