जम्मू, – देशापुढील आव्हानांच्या संबंधात कॉंग्रेसने आता आपल्या घरातच बसण्याऐवजी सजग होऊन लोकांसाठी आवाज उठवण्यासाठी सज्ज झाले पाहिजे असे आवाहन नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे. जम्मू काश्मीर नॅशनल पॅंथर्स पक्षाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे आवाहन केले.
ते म्हणाले की आमचा पक्ष आणि नॅशनल पॅंथर्स पक्षाचे अस्तित्व केवळ जम्मू काश्मीर राज्यापुरते मर्यादित आहे. कॉंग्रेसचे अस्तित्व मात्र संपुर्ण देशात आहे. त्यांनी आता उभे राहून देशापुढे निर्माण झालेल्या आव्हानांचा मुकाबला केला पाहिजे. देशाला जो धोका निर्माण झाला आहे त्याचे आव्हान कॉंग्रेसनेच स्वीकारले पाहिजे असे ते म्हणाले. कॉंग्रेस घरात बसणार असेल तर हे आव्हान अधिक कडवे होत जाणार आहे. पण कॉंग्रेस सध्या कमजोर झालेली दिसते आहे असेही त्यांनी म्हटले आहे. केंद्र सरकरने जम्मू काश्मीरला विषेश राज्याचा दर्जा असलेली तरतूद काढून टाकली आहे. त्यामुळे या राज्यातील जमीन आता कोणीही बळकाऊ शकतो आमच्या मुलांनाही येथे रोजगार करणे मुष्किल होणार आहे.
महाराजा हरिसिंग यांनी डोगरा समाजाचे अस्तित्व टिकवण्यासाठी या राज्याचे विशेषाधिकार जपले होते. पण सध्याच्या केंद्र सरकारने आमच्या या अधिकारावर अतिक्रमण केले आहे असे ते म्हणाले. जम्मू काश्मीर नॅशनल पॅंथर्स पार्टीच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमीत्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी या पक्षाचे प्रमुख भीमसिंग यांचीही पक्षाध्यक्षपदी तीन वर्षांसाठी फेरनिवड झाली आहे.