नवी दिल्ली : काँग्रेसमधील कलह काही केल्या कमी होत नाहीत. त्यातच आता काही दिवसात काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात अनेक हालचाली होताना दिसत आहेत. काँग्रेस नेते सचिन पायलट दिल्लीमध्ये पोहोचले असून पायलट आज काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर अशोक गेहलोत हे ही सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. रविवारी राजस्थानमध्ये काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकली नाही. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आल्याचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थकांना वाटत होते. त्यामुळेच त्यांनी बैठकीला हजेरी लावली नाही. अनेक आमदारांनी आपले राजीनामे सभापती सीपी जोशी यांच्याकडे सुपूर्द केले. यावर कडकपणा दाखवत काँग्रेसच्या पदश्रेष्ठींनी तीन नेत्यांना नोटीस बजावली आहे.
सचिन पायलट मंगळवारी दुपारी दिल्लीला पोहोचले. विमानतळावर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं. राजस्थानमधील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करुन दिल्लीत परतलेले काँग्रेसचे पर्यवेक्षक अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी मंगळवारी संध्याकाळी त्यांचा लेखी अहवाल सोनिया गांधी यांच्याकडे दिला आहे. यामध्ये राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय शांती धारिवाल, महेश जोशी आणि धर्मेंद्र राठोड यांच्यावर रविवारी पक्षाने शिस्तभंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. काँग्रेस हायकमांडने तीन आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देत राजस्थान सरकारमधील मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी, “2020 मध्ये मानेसरला गेलेल्यांवर शिस्तभंगाची कारवाई व्हायला हवी होती. सोनिया गांधी यांचा निर्णय मान्य करण्यास आमदार तयार आहोत. आम्हाला आमच्याच लोकांशी लढायचे नाही. धारीवाल यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी मुद्दे मांडले असतील तर पक्षाने त्यात लक्ष घालायला हवं”. असे त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या उमेदवारीचा निर्णय सोनिया गांधी यांच्याकडे आहे.