नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या भविष्यातील वाटचालीसाठी कॉंग्रेसच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी मंगळवारी तीन स्वतंत्र टास्कफोर्स तयार केले आहेत. यातील एक स्वतंत्र टास्कफोर्स सन 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या संबंधातील तयारीसाठी नेमण्यात आला असून दुसरा टास्क फोर्स भारत जोडो यात्रेचे नियोजन करण्यासाठी तयार करण्यात आला आहे. प्रमुख राजकीय मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यासाठीही एक स्वतंत्र गट स्थापन करण्यात आला आहे.
पक्षाच्या उदयपुर घोषणेत असे टास्कफोर्स स्थापन करण्याचे ठरले होते. त्यानुसार हे तीन गट स्थापन करण्यात आले आहेत. गांधी जयंतीपासून पक्षातर्फे काश्मीर ते कन्याकुमार अशी एक भारत जोडो यात्रा काढली जाणार आहे त्याचीही तयारी पक्षाने हाती घेतली आहे.
सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील राजकीय घडामोडीवर मार्गदर्शन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या गटात राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, दिग्विजय सिंग, आनंद शर्मा, के सी वेणुगोपाल आणि जितेंद्र सिंग यांचा समावेश आहे.
टास्क फोर्स-2024 मध्ये पी चिदंबरम, मुकुल वासनिक, जयराम रमेश, के सी वेणुगोपाल, अजय माकन, प्रियंका गांधी वड्रा, रणदीप सिंग सुरजेवाला आणि सुनील कानुगोलू यांचा समावेश करण्यात आला आहे. टास्क फोर्सच्या प्रत्येक सदस्याला संघटनात्मक, कम्युनिकेशन, प्रसार माध्यम हाताळणी, लोकसंपर्क, वित्त आणि निवडणूक व्यवस्थापनाशी संबंधित विशिष्ट कार्ये दिली जाणार आहे. या गटांना त्यांची स्वतंत्र टीमही नियुक्त करता येईल. त्याची घोषणा नंतर केली जाणार आहे. राजस्थानच्या उदयपूर येथे कॉंग्रेसच्या तीन दिवसीय विचारमंथन सत्रात ठरल्याप्रमाणे संघटनात्मक बदल घडवून आणण्यासाठी ही टास्क फोर्स कार्यरत असणार आहेत