मुंबई – राज्यात हातातून गेलेली सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार भाजपच्या हातून हिसकावून आणली. यामुळे चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरलेल्या काँग्रेसला अचानक सत्तेची लॉटरी लागली. शरद पवार यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रसला एकत्र करून महाविकास आघाडी स्थापन करत बलाढ्य़ भाजपला सत्तेपासून दूर ठेवले. मात्र सत्तेतील एक वर्ष पूर्ण होताच, काँग्रेसला स्वबळाचे वेध लागल्याचे दिसत आहे. तर राष्ट्रवादी मात्र महाविकास आघाडीवर ठाम आहे.
प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मात्र स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अजिबात विचार नाही. आम्ही महाविकास आघाडीत आहोत. भाजपला पराभूत करणं हे आमचं ध्येय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी ही आघाडी निर्माण केली आहे,’ असेही जयंत पाटील म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून परिवार संवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या पहिल्या टप्प्याला येत्या 28 जानेवारीपासून सुरुवात होईल. त्यात संपूर्ण विदर्भ आणि खानदेश असे 14 जिल्हे आणि 42 मतदारसंघाचा आढावा घेणार असल्याचे पाटील यांनी म्हटले.
दुसरीकडे काँग्रेसकडून विधानसभेचे अध्यक्ष आणि संभाव्य प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसला स्वबळावर यश मिळवून देण्याचे वक्तव्य केले. तर महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी देखील स्वबळावर काँग्रेस सत्तेत येऊ शकते, असं विधान केले. त्यासाठी बाळासाहेब थोरात यांनीच प्रदेशाध्यक्ष राहावे, असंही त्यांनी म्हटले आहे.