नवी दिल्ली – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार लवकरच बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 एप्रिलपासून तीन दिवसांसाठी ते बंगालमध्ये फिरून प्रचार करतील. मात्र, ते तृणमूल कॉंग्रेसच्या व्यासपीठावरून प्रचार करणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, शरद पवार यांनी तृणमूल कॉंग्रेससाठी प्रचार केल्यास ममता बॅनर्जी यांना फायदा मिळू शकतो. तर कॉंग्रेस पक्षासाठी हा धक्का ठरेल, असा दावा करण्यात येतो आहे.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेते प्रदीप भट्टाचार्य यांनी शरद पवार यांना पत्र लिहून बंगालमध्ये प्रचाराला येऊ नये, अशी विनंती केली होती. राजदचे नेते तेजस्वी यादव यांनाही कॉंग्रेसकडून असेच पत्र पाठवण्यात आले होते. पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसचा लढा हा सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस पक्षाशी आहे. तुमच्यासारखे स्टार प्रचारक तृणमूल कॉंग्रेसच्या व्यासपीठावर गेले तर सामान्य मतदारांच्या मनातील संभ्रम वाढेल. त्यामुळे आपण तृणमूल कॉंग्रेसच्या प्रचारात ममता बॅनर्जी यांच्या बाजूने उतरू नये, असे भट्टाचार्य यांनी पत्रात म्हटले होते. मात्र, शरद पवार यांनी कॉंग्रेसची ही विनंती अमान्य केल्याचे स्पष्ट होत आहे.
शरद पवार यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा भाग आहे. यामध्ये कॉंग्रेस पक्षाचाही समावेश आहे. त्यामुळे शरद पवार पश्चिम बंगालमध्ये कॉंग्रेसचा विरोधक असणाऱ्या तृणमूलच्या प्रचारास गेल्यास ही बाब कॉंग्रेस नेत्यांना खटकू शकते.
तर दुसरीकडे तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाची (राजद) बिहारमध्ये कॉंग्रेसशी युती आहे. गेल्यावर्षीची विधानसभा निवडणुकही दोन्ही पक्षांनी एकत्र लढवली होती. त्यामुळे तेजस्वी यादवही युतीधर्माच्या बंधनात अडकलेले आहेत.
मात्र, आगामी काळात राष्ट्रीय स्तरावरील समीकरणे जुळवायची असतील तर पश्चिम बंगालमध्ये भाजप विरोधकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ही तिसऱ्या आघाडीची नांदी ठरू शकते. मात्र, आता कॉंग्रेसच्या भूमिकेमुळे यामध्ये खोडा घातला जाण्याची शक्यता आहे.