मुंबई – महाराष्ट्रासंदर्भात मुंबईबरोबरच दिल्लीत महत्वाच्या भेटीगाठी झाल्या. मात्र, त्यानंतरही सरकार स्थापनेविषयीचा राजकीय सस्पेन्स कायम राहिला आहे. भाजपशी बिनसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सत्तास्थापनेची स्वप्ने शिवसेना पाहत आहे. यासंबंधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. परंतु, काँग्रेस अद्यापही शिवसेनेला पाठिंबा देण्याच्या मन:स्थितीत नसल्याचे दिसून येत आहे.
एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. राज्यातील काही काँग्रेस नेत्यांचे पाठिंबा देण्याबद्दल वेगळे मत आहे. शरद पवार पाठिंबा देण्यासाठी तयार झाले तरी सोनिया गांधींचा अद्यापही नकारच असल्याचे कळते आहे. तसेच सोनिया गांधींसोबत शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे शरद पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले होते.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 11 दिवसांचा कालावधी उलटला. त्यानंतरही महायुतीचे सरकार स्थापन होणार की वेगळीच सत्तासमीकरणे जुळून येणार याबाबत कुठलीही स्पष्टता आलेली नाही.