नवी दिल्ली – पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या उर्वरित टप्प्यांमधील निवडणूक प्रचार सभा रद्द करण्याचा निर्णय कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी घोषित केला आहे. करोना काळात अशा सभा घेणे धोकादायक असून, अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही तसा निर्णय घेणे गरजेचे आहे, असे आवाहन त्यांनी केले आहे. पश्चिम बंगालमध्ये अजून तीन टप्प्यांच्या निवडणुकीचा प्रचार बाकी आहे.
तेथील हे टप्पे रद्द करून एकाच दिवशी सारे मतदान उरकून टाका, अशी सूचना तृणमूल कॉंग्रेसने निवडणूक आयोगाला केली होती. पण ती सूचना निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. मोदी, शहा यांच्यासह भाजपचे अनेक नेते तसेच ममता बॅनर्जीही बंगालमध्ये जोरदार प्रचार करीत आहेत. त्यासाठी मोठी गर्दी जमवली जात असून, करोना काळात अशी गर्दी जमवणे धोकादायक असल्याने ती लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी हा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर अन्य पक्षाच्या राजकीय नेत्यांची मात्र आता गोची झाली असून, मोदी, शहा तसेच ममता आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, राहुल गांधी यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर मात्र चांगले समर्थन केले जात आहे.