कॉंग्रेसच्या बहुचर्चित कार्यकारिणीची काल बैठक झाली. या पक्षाने आधी जाहीर केलेल्या घोषणेनुसार पक्षाचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष जून महिन्याच्या आत निवडला जाणार होता. त्यानुसार या कार्यकारिणीत पक्षाच्या अध्यक्षीय निवडणुकीचा निदान कार्यक्रम तरी जाहीर होईल अशी अपेक्षा होती. पण याहीवेळी कॉंग्रेसने अध्यक्षपदाची निवडणूक अनिश्चित काळासाठी टाळली आहे.
आज दोन वर्षे होत आली तरी कॉंग्रेससारख्या महत्त्वाच्या राष्ट्रीय पक्षाला त्यांचा पूर्णवेळ अध्यक्ष नेमता आलेला नाही किंवा त्यांनी तशी इच्छाच अजून दाखवलेली नाही. 2019 च्या निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर सतत या ना त्या कारणाने नवीन अध्यक्षांची निवड पुढे ढकलण्यात आली. सोनिया गांधींकडे सध्या पक्षाचे अध्यक्षपद आहे, पण ती केवळ एक हंगामी सोय आहे. नवीन अध्यक्ष निवडला जाईपर्यंत अध्यक्षपदाची सूत्रे राजकारणापासून दूर गेलेल्या सोनियाजींकडे सोपवण्यात आली होती. राहुल गांधी पुन्हा पक्षाध्यक्ष व्हायला तयार नाहीत असे मध्यंतरीचे चित्र होते, पण पुन्हा त्यांनी आपली त्यासाठी ना नाही असेही जाहीर केले होते. त्यामुळे येत्या जूनपूर्वी राहुल गांधी हे अध्यक्ष होतील, असे सर्वच जण गृहीत धरून चालले होते. पण यावेळी करोनाचे कारण देऊन निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. हे वरवरचे कारण आहे हे सर्वांनाच माहिती आहे. कोविडची सर्व दक्षता घेऊन कॉंग्रेस अध्यक्षांची निवड करणे कॉंग्रेसला अशक्य नाही. किंबहुना नवीन अध्यक्ष निवडण्यासाठी प्रत्यक्ष निवडणुकीचीही औपचारिकता घेण्याची त्यांना गरज नाही. असे असताना कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवड का टाळते आहे, याचे कोडे सर्वांनाच पडले आहे. आज मोदी सरकारच्या विरोधात संपूर्ण देशभर मोठे असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पण मोदी नको, मग पर्याय कोण, अशी विचारणा सर्वजण करीत आहेत. कोणत्याही औपचारिक नेतृत्वाशिवायच कॉंग्रेस पक्षाची अशीच वाटचाल सुरू राहणे हे त्या पक्षाच्या भवितव्याच्या दृष्टीने योग्य नाही, हे त्यांना कोणी सांगण्याची गरज नाही. ही वस्तुस्थिती त्यांना समजत नसावी, असे मानता येणार नाही. पक्षाला आता पूर्णवेळ सक्रिय व दृश्य स्वरूपाचा अध्यक्ष असला पाहिजे, असे मध्यंतरी पक्षातल्याच 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला पत्र लिहून कळवले होते. या पत्रावरूनही मोठाच गहजब उडाला होता. आज कॉंग्रेसला कोठेच अनुकूल वातावरण नाही, त्यामुळे आपल्याकडून होणाऱ्या कोणत्याही आगळिकीचा भाजपकडूनही मोठ्या प्रमाणात गहजब माजवला जाईल, याची कॉंग्रेसजनांना कल्पना नसेल असेही नाही. पण तरीही ते यातून बोध का घेत नाहीत, हा मुख्य विषय आहे. अजून किती दिवस ते हा अध्यक्ष निवडीचा विषय टाळणार आहेत आणि त्या मागचे त्यांचे लॉजिक काय आहे, हे समजायला हवे.
ऐवीतेवी राहुल गांधी हेच जर पुन्हा पक्षाचे अध्यक्ष होणार असतील तर त्यासाठी इतका नाहक विलंब कशासाठी लावला जातोय हे समजायलाही काही मार्ग नाही. गांधी घराण्यातील कोणीही अध्यक्षपद स्वीकारणार नाही अशी घोषणा राहुल गांधी यांनी मध्यंतरी केली होती. पण पुन्हा सोनियाच अध्यक्ष झाल्या आहेत. गांधी घराण्याबाहेर पक्षाचे अध्यक्षपद जाऊ द्यायचे नाही हे कॉंग्रेसजनांचे पक्के ठरलेले असेल तर मग विनाकारण पक्षाला ते
स्वतःहूनच अशा अधांतरी अवस्थेत का ठेवत आहेत, हा प्रश्न निर्माण होतो. कॉंग्रेसकडे गांधी घराण्याच्या बाहेरही अनेक चांगली नावे आहेत. एक तात्पुरती व्यवस्था म्हणून तरी अशा दुसऱ्या पर्यायाचा विचार त्यांनी करायला हवा. कॉंग्रेसचा अध्यक्ष कोणीही असला तरी त्या पक्षाची सारी सूत्रे गांधी घराण्यातूनच हलणार आहेत, असेच जर सारे गृहीत धरून चालले असतील तर मग हा पर्यायी नावाचा विचार करायलाही हरकत नव्हती. पण कॉंग्रेस पक्षाला तेही करायचे नाही, असे दिसते आहे.
हा पक्ष स्वतःच स्वतःच्या नेत्यांचे ग्लॅमर घालवून बसत आहे, असेही सध्या दिसते आहे. प्रियांका गांधींना वलय होते पण त्यांच्यावर मर्यादित स्वरूपाचीच जबाबदारी देऊन त्यांनाही नाहक निष्प्रभ व्हावे लागले आहे. याचा विपरीत परिणाम पुन्हा अखेर पक्षालाच भोगावा लागणार आहे. कॉंग्रेस हा स्थितीवादी पक्ष आहे. झटकन एखादा निर्णय घेणे ही या पक्षाची कार्यपद्धती नाही याची सर्वांनाच कल्पना आहे. पण हीच भूमिका जर पक्षाचा अध्यक्ष निवडण्यातही घेतली जात असेल तर कॉंग्रेस सन 2024 च्या निवडणुकीपर्यंत तरी कशी समर्थ होऊ शकेल, हा सवाल निर्माण होतो. नवीन लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष सामर्थ्यवान करायचा असेल तर एव्हाना नवीन पक्षाध्यक्ष तरी कॉंग्रेसने निवडणे आवश्यक होते. अजून तीन वर्षांचा अवधी आहे, बघू नंतर ही भूमिका त्यांनाच नुकसानदायक ठरू शकते. नवीन अध्यक्ष निवडला की कॉंग्रेस लगेच सत्तेवर येईल, अशीही आज स्थिती नाही. पक्षाची जी प्रचंड पडझड झाली आहे, ती सावरायला नवीन अध्यक्षांना बरेच कष्ट घ्यावे लागणार आहेत. त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी पुरेसा नाही.
त्यामुळे पक्षाने एव्हाना नवीन अध्यक्ष निवडून ही स्वतःच निर्माण केलेली अस्थिरता संपवायला हवी होती. देशाच्या राजकारणाचे वारे वेगाने बदलते आहे. नवनवीन समीकरणेही उदयाला येत आहेत. प्रादेशिक पक्षांचे प्राबल्य पुन्हा वाढायला लागले आहे. याची मोट बांधून राष्ट्रीय राजकारणात समर्थ पर्याय निर्माण करणे ही कॉंग्रेसची जबाबदारी आहे. त्यासाठी त्यांच्याकडूनच हालचाली व्हायला हव्या आहेत. अन्य पक्षही अशा प्रस्तावांची वाट पाहात आहेत. पण कॉंग्रेसच अजून काही हालचाल करायला तयार नाही. या पक्षाला नेमकी धास्ती कशाची वाटते आहे, हेही समजायला मार्ग नाही. त्यामुळे कॉंग्रेससारखा महत्त्वाचा पक्ष दिवसेंदिवस अशाच गर्तेत जाणार असेल, तर त्याला दुसरे कोणी नव्हे तर खुद्द कॉंग्रेस पक्षच जबाबदार असणार आहे. कॉंग्रेसला स्वतःची विस्कटलेली घडी बसवण्यासाठीचेही निर्णय घेता येत नसतील तर ते भाजपने विस्कटलेली देशाची घडी कशी नीट करू शकतील, असा प्रश्न आता लोकांकडूनच विचारला जाईल.