नवी दिल्ली – राष्ट्रद्रोही आणि गरीबांचे शत्रू देशांत द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत. देशातील लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव वाढत आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शनिवारी केली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना कल्पनाही नसेल की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरच लोकशाही धोक्यात येईल. कुविचारी लोकांचा प्रभाव वाढत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि लोकशाही संस्था जमीनदोस्त होत आहेत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
नवा रायपूर येथे छत्तिसगढ विधानसभेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी सोनिया बोलत होत्या. त्यांनी ध्वनी मुद्रित संदेश पाठवला होता.
गेल्या काही काळापासून देशाची घडी विस्कटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. आपल्या लोकशाहीपुढे नवी आव्हाने उभी रहात आहेत. आज आपला देश मार्ग बदलण्याच्या जागेवर उभा आहे. लोकांनी एकमेकांशी भांडण्यात वेळ घालवावा म्हणून काही लोक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. गरीबांचे द्वेष्टे हिंसाचार पसरवत आहेत, असे कॉंग्रेस अध्यक्ष म्हणाल्या. देशातील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका कोणाचेही नाव न घेता त्यांनी केली.