नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकांमध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस नेतृत्वाकडून आज एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पक्षाने घेतलेल्या या निर्णयाबाबत आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे माहिती दिली असून यापुढील महिनाभराच्या कालावधीसाठी काँग्रेसचे कोणतेच प्रवक्ते न्यूज चॅनेल्सवरील चर्चांमध्ये सहभाग नोंदवणार नाही येत. काँग्रेसकडून घेण्यात आलेल्या या निर्णयाची माहिती देतानाच सुरजेवाला यांनी विविध टीव्ही चॅनल्सच्या संपादकांना देखील आपल्या चॅनेल्सवरील चर्चासत्रांमध्ये कोणत्याही काँग्रेस प्रवक्त्यासाठी जागा ठेऊ नका अशी विनंती केली आहे.
.@INCIndia has decided to not send spokespersons on television debates for a month.
All media channels/editors are requested to not place Congress representatives on their shows.
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) May 30, 2019
तत्पूर्वी, लोकसभा निवडणुकांमध्ये रसातळाला पोहोचलेल्या काँग्रेसतर्फे गेल्या शनिवारी दिल्ली येथे कार्यकारणी समितीची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षातील जेष्ठ नेत्यांवर पक्ष कार्यापेक्षा आपल्या मुलांच्या प्रचारावर वेळ वाया घालवला असा आरोप देखील लावला होता. राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकांमधील पक्षाच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देखील सादर केला होता मात्र कार्यकारणीने एकमुखाने राहुल गांधींचा राजीनामा फेटाळला होता. कार्यकारणीने राजीनामा फेटाळला असला तरी राहुल गांधी आपल्या राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. अशातच आता काँग्रेसतर्फे आपल्या प्रवक्त्यांना टीव्हीवरील चर्चासत्रांमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आल्याने काँग्रेस नव्याने पक्ष बांधणी करण्याच्या तयारीत आहे काय असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.