चेन्नाई – राजीव गांधी हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या सात आरोपींना कारागृहातून मुक्त करण्यास कॉंग्रसने विरोध केला आहे. राजकीय पक्षांकडून केली जाणारी ही मागणी आम्हाला अमान्य आहे असे तामिळनाडू प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष के. एस. अळगिरी यांनी म्हटले आहे.
द्रमुकने या आरोपींना सोडून देण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे. द्रमुक हा पक्ष कॉंग्रेस प्रणित युपीए आघाडीचा घटक पक्ष आहे. या मुद्द्यावरून तामिळनाडूत आता या दोन पक्षांमध्ये वितुष्ट आले आहे.
कॉंग्रेसने म्हटले आहे की राजीव हत्या प्रकरणातील आरोपींना कारागृहातून सोडण्यात आले तर देशात अन्यत्रही अशी मागणी पुढे येईल. खुनाच्या आरोपाखाली 25 वर्षाहून अधिक काळ कारागृहात घालवणाऱ्या सगळ्याच आरोपींना याच आधारावर सोडून द्यावे लागेल. त्यातून मोठीच समस्या निर्माण होईल असे कॉंग्रेसने म्हटले आहे.
राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात आरोपी गेल्या 25 वर्षांहून अधिक काळ कारागृहात आहेत. उर्वरीत शिक्षा माफ करून आमची कारागृहातून सुटका करावी अशी या आरोपींनी तामिळनाडुंच्या राज्यपालांना विनंती केली आहे. त्यांचा हा अर्ज गेले दोन वर्ष प्रलंबीत आहे.
त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा अशी सुचना सर्वोच्च न्यायालयानेही केली आहे. त्यामुळे आता तामिळनाडुतील बहुतेक सर्व राजकीय पक्षांनी या आरोपींना दया दाखवावी अशी मागणी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने आपली ही भूमिका स्पष्ट केली आहे. हा निर्णय राजकीय स्वरूपाचा असता कामा नये आरोपींना सोडण्याचा निर्णय कोर्टाने दिला तर आम्ही तो मान्य करू असे तामिळनाडू प्रदेश कॉंग्रेस समितीने म्हटले आहे.