मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत चिंताजनक वेगाने वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांची दैनंदिन रुग्णवाढ चाळीस हजारांच्या वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील जनतेला संबोधित करताना कोरोनाला रोखण्यासाठी कठोर निर्बंधांसह लॉकडाऊनचे संकेत दिले होते. मात्र आता राज्यात सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील एक प्रमुख घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने लॉकडाऊनविरोधी भूमिका मांडली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संबोधनानंतर त्यांनी दिलेल्या लॉकडाऊनच्या इशाऱ्यााबाबत काँग्रेसचे मुंबई प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी पुन्हा एकदा सरसकट लॉकडाऊन परवडणारा नसल्याचे विधान केले. भाई जगताप म्हणाले की, मला असं वाटतं की कोरोनाचे आकडे वाढत आहेत त्याची चिंता तुम्हा आम्हा सर्वांनाच आहे. स्वाभाविकपणे राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनाही ती चिंता आहे. परंतु लॉकडाऊनबाबत याआधीही आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे.
पूर्ण लॉकडाऊन न करता आता जो काही नाईट कर्फ्यू आहे त्यामध्ये परिस्थितीचे गांभीर लक्षात घेऊन अधिक काय करता येईल याचा विचार व्हायला हवा, असे भाई जगताप यांनी सांगितले. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांसमोर निर्माण झालेल्या आर्थिक समस्यांचाही भाई जगताप यांनी यावेळी उल्लेख केला. आज सर्वसामान्यांची परिस्थिती अशी आहे की लॉकडाऊनचा सामना करण्याची त्यांची क्षमता नाही.
मागचे वर्षं मागचं लॉकडाऊन कसंतरी या सर्वसामान्यांनी काढलं आहे. आता त्यांच्याकडे काही उरलेले नाही. त्यामुळे आता एक नवीन आव्हान राज्यासमोर आणि सरकारसमोर असेल. त्यामुळे पूर्णत: लॉकडाऊन नसावा, या गोष्टीवर आम्ही ठाम आहोत, असे काँग्रेस नेते आणि काँग्रेसचे मुंबईचे प्रदेशाध्यक्ष भाई जगताप यांनी सांगितले.