नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते उदित राज यांनी कुंभ मेळ्यासाठी सरकारी खर्च करण्यावर आक्षेप घेतला. त्यावरून भाजपकडून कॉंग्रेसवर निशाणा साधण्यात आला. त्याशिवाय, साधू-संतांनीही नाराजी व्यक्त केली.
माजी खासदार असणाऱ्या उदित राज यांनी ट्विटरवरून मांडलेली भूमिका वादग्रस्त ठरली आहे. सरकारी निधीतून मदरसे न चालवण्याचा निर्णय आसाम सरकारने घेतला. त्याप्रमाणेच उत्तरप्रदेश सरकारनेही कुंभ मेळ्यासाठी 4 हजार 200 कोटी रूपये खर्च करायला नकोत. धर्माशी निगडीत बाबींमध्ये कुठल्या सरकारने लक्ष घालू नये, असे त्यांनी म्हटले.
त्यावरून भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. उदित राज यांच्या भूमिकेमुळे कॉंग्रेसच्या गांधी परिवाराचे खरे रूप समोर आले. याआधी कॉंग्रेसच्या सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून भगवान श्रीराम काल्पनिक असल्याचे म्हटले होते, याकडे पात्रा यांनी लक्ष वेधले.
तर, उदित राज यांनी मांडलेली भूमिका म्हणजे कॉंग्रेसच्या हिंदूविरोधी मानसिकतेचे प्रतिबिंब असल्याची प्रतिक्रिया साधू-संतांच्या समुदायाकडून देण्यात आली.
उदित राज 2014 मधील निवडणुकीत भाजपच्या तिकिटावर दिल्लीतून लोकसभेवर निवडून गेले. मात्र, पुढील निवडणुकीत त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. त्यामुळे भाजपला रामराम ठोकून त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला.