जम्मू – गेल्या दशकांत कॉंग्रेसची ताकद लक्षणीयरित्या कमी झाली आहे. त्यामुळे नव्या नेत्यांच्या पिढीला जोडून घेण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत कॉंग्रेसमधील “ग्रुप ऑफ23′ किंवा जी 23 नेत्यांच्या गटाने व्यक्त केले. जम्मूमध्ये या नेत्यांची शनिवारी बैठक सुरू झाली. गेल्या वर्षी या नेत्यांनी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका केली होती.
या नेत्यांच्या या बैठकीला शांती संमेलन असे नाव देण्यात आले आहे. त्यात कपिल सिब्बल म्हणाले, संसदेतून निवृत्त होण्याच्या गुलाम नबी आझाद यांच्या निर्णयाला मंजूरी दिल्याने आपल्याला खूप दु:ख झाले. त्यांच्या अनुभवाचा वापर कॉंग्रेसला अधिक चांगला करून घेता आला असता.
ते (आझाद) एक असे नेते होते की त्यांना प्रत्येक राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाची प्रत्यक्ष स्थिती माहिती होती. त्यामुळे संसदेतून त्यांना मुक्त करण्यात आले, हे आम्हाला जेंव्हा समजले, तेंव्हा आम्हाला दु:ख झाले. त्यांनी संसदेतून जावे, असे आम्हाला वाटत नव्हते. मला समजत नाही, कॉंग्रेस त्यांच्या अनुभवाचा वापर करून का घेत नाही? असेही त्यांनी सांगितले.
गुलाम नबी यांची प्रत्यक्षात भूमिका काय हवी होती? विमान चालवणारी ही व्यक्ती अनुभवी आहेच. त्यांच्यात असणारा अभियंता यंत्रात झालेला बिघाड दूर करू शकतो. गुलाम नबी आझाद हे अनुभवी आणि त्याच बरोबर अभियंताही आहेत, असे सांगून सिब्बल म्हणअले, ते आणि त्यांचे सहकारी पक्षाला भेडसावत असणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी एकत्र जमले आहेत. आम्ही यापुर्वीही एकत्र आलो होतो. पक्षाला मजबूत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत.
राहूल गांधी यांच्या उत्तर- दक्षिण विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार देत सिब्बल यांनी त्यांच्यापासून दूर राहणे पसंत केल्याचे मानले जाते. राहूल यांच्या विधानावर प्रतिक्रिया देण्यास मी कोणीच नाही असे सिब्बल म्हणाले होते. त्याबाबत ते म्हणाले, मी कोणत्या अर्थाने हे म्हणालो हे लक्षात घ्या.. आपण देशातील मतदारांच्या शहाणपणाचा आदर केला पाहिजे. त्यांच्या चातुर्याला कमी लेखून चालणार नाही, असे त्यांनी सांगितले.
आझाद आणि सिब्बल यांच्याशिवाय मनिष तिवारी, आनंद शर्मा, भूपिंदर हुडा आणि राज बब्बर हे यावेळी उपस्थित होते. आनंद शर्मा म्हणाले, 1950 नंतर प्रथमच राज्यशसभेत जम्मू काश्मिरला प्रतिनिधीत्व नाही. त्यात तातडीने सुधारणा करायला हवी. गेल्या दशकभरात पक्षाची ताकद क्षीण झाली आहे. आमचा आवाज हा पक्षाच्या भल्यासाठी आहे. त्यामूळे पक्ष पुन्हा एकदा ताकदवान बनू शकेल. आम्ही पक्षाचे चांगले दिवस पाहिले आहेत, आम्ही वयस्कर झालो म्हणून पक्ष कमजोर झाला, असे होऊ नये. आम्ही कॉंग्रेसला वाचवू.
आम्ही कॉंग्रेसचे आहोत की नाही हे सांगण्याचा कोणालाही हक्क नाही. आम्ही पक्षाची बांधणी करू. त्याला बळ देऊ. आम्ही पक्षाची ताकद आणि एकता यावर विश्वास ठेवणारे आहोत,अशी पुस्ती त्यांनी जोडली.