नवी दिल्ली – सत्तावाटपाच्या सुत्रावरून भाजप आणि शिवसेना या मित्रपक्षांचे बिनसले आहे. यामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस हे पक्ष एकत्र येण्याची शक्यता काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. परंतु, काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असे महत्वपूर्ण वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
रामदास आठवले म्हणाले कि, शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नये. असे केल्यास हा आत्मघातकी निर्णय ठरेल. राज्यातील जनतेने महायुतीला कौल दिला आहे. शरद पवारांनी आणि सोनिया गांधींनी जनतेच्या मतांचा आदर करावा. तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देऊ नये, असे मी शरद पवारांना आणि सोनिया गांधी यांना आवाहन करतो.
५०-५०च्या फॉर्म्युल्यावर आठवले म्हणाले कि, शिवसेनेने आडमुठेपणाची भूमिका सोडून उपमुख्यमंत्रीपद पदरात पडून घ्यावे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्तास्थापनेचा ५०-५०चा फॉर्म्युला ठरवण्यात आला होता. मात्र, ५०-५० म्हणजे एकाला मुख्यमंत्री पद तर दुसऱ्या पक्षाला उपमुख्यमंत्री पद असा त्याचा अर्थ होतो, असे त्यांनी सांगितले.