सोलापूर – उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टी व बहुजन समाज पक्ष यांनी युती करून कॉंग्रेससाठी दोन जागा सोडल्या असताना देखील कॉंग्रेसने जाणीवपूर्वक येथे सर्व 80 जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशीच परिस्थिती विविध राज्यात दिसत असून यामुळे हे दोन्ही कॉंग्रेस पक्ष भाजपासाठी काम करीत असल्याचे स्पष्ट होते. कॉंग्रेस-राष्ट्रवादी हेच भाजपची “ए’ टीम आहे, असा टोला आनंदराज आंबेडकर यांनी पंढरीत झालेल्या पत्रकार परिषदेत जोरदार लगाविला.
ऍड. प्रकाश आंबेडकर यांचा सोलापूरशी काय संबंध असा सवाल करणाऱ्या शरद पवार यांना ते म्हणाले, पवारांची सोलापुरातील सभा अत्यंत केविलवाणी अशी होती. यास मिळालेला प्रतिसाद अत्यल्प होता आणि ज्यांनी मैदानातून पळ काढला त्यांच्याविषयी आम्ही काय बोलायचे?, असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.
तसेच आम्ही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांना पाठिंबा मागितला नसून ज्याला योग्य वाटते तो आमचे समर्थन करीत आहे. आजपर्यंत अनेक निवडणूका पाहिल्या. परंतु या निवडणुकीत सर्व जाती, धर्माचा व विविध पक्ष, संघटनांचा मोठा प्रतिसाद वंचित आघाडीला मिळत आहे. यामुळे राज्यात आम्ही चमत्कार करणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर जो पक्ष धर्मनिरपेक्षता, संविधानावर विश्वास ठेवणार असेल त्याला पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
भाजपने निवडणूकीसाठी धर्मगुरूंना वेठीस धरले
भाजपाने विकासाची काम होत नसल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघात धर्मगुरूला निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. परंतु यामुळे त्यांच्या समाजात नाराजी निर्माण झाली आहे. या मोठ्या धर्मगुरूला निवडणुकीसाठी वेठीस बांधणे चांगले नसून हा निर्णय अनेकांना रूचला नाही. याचा फायदा वंचित आघाडीला होणार असल्याचा दावा आनंदराज आंबेडकर यांनी केला.