– वंचित आघाडीचाही करणार विचार
मुुंबई – आगामी विधानसभा निवडणूकीच्या पाश्वभूमीवर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आतापासूनच कामाला लागले आहेत. निवडणूकीत जागावाटपावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या पुढील आठवड्यात 16 जुलै रोजी बैठक होणार आहे. या बैठकीत समविचारी छोट्या पक्षांबरोबरच वंचित बहुजन आघाडीचा समावेश करण्याबाबत विचार केला जाईल, अशी माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली.
विधानसभा निवडणूकीच्या जागा वाटपासंदर्भात आज अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी बंगल्यावर सुमारे चार तास बैठक झाली. या बैठकीत अनेक अनेक बाबींवर विचारविनिमय करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी अशोक चव्हाण बोलत होते. विधानसभा निवडणूकीची पूर्वतयारीसाठी आजची बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांबरोबर चर्चा करण्यासाठी अंतर्गत चर्चा केली, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
विधानसभेच्या जागावाटपाबाबत 16 जुलै रोजी राष्ट्रवादीबरोबर एकत्र चर्चा करणार आहोत. या बैठकीत दोन्ही पक्षांतील जागावाटप आणि कोणत्या जागा मित्र पक्षांना सोडायच्या याबाबत चर्चा होणार आहे. वंचित आघाडी आमच्यासोबत यावी अशी आमची भूमिका आहे. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेस सोबत चर्चा केल्यानंतरच वंचितशी संपर्वै करू, अशी भूमिका चव्हाण यांनी यावेळी मांडली. मात्र, मनसेला आघाडीत घेण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय झालेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आज त्यांचे दिवस आहेत…
आज सत्तेत असलेल्या शिवसेना आणि भाजपाच्या संपर्कात कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे अनेक आमदार आहेत. अन्य पक्षातील उमेदवारांना तिकिट आणि पैसे दिले जात आहेत. संपूर्ण देशात भाजपाने हा चुकीचा पायंडा पाडला आहे. वेैंद्रात त्यांचे सरकार आल्यापासून त्यांनी हे उद्योग सुरु केले आहेत. पण आज त्यांचे दिवस आहेत, उद्या दिवस बदलले कि त्यांना समजेल, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला.
विद्यमान आमदारांना पुन्हा तिकिट मिळणार
गेल्या विधानसभा निवडणूकीतील मतांची टक्केवारी पाहून कॉंग्रेस निवडणूकीसाठी रणनिती आखणार आहे. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जागा वाटपाच्या चर्चेनंतर कॉंग्रेस आपल्या विद्यमान आमदारांना तिकिट देण्याची शक्यता आहे. मात्र, राष्ट्रवादी 50-50 चा फॉम्रयुला कॉंग्रेससमोर ठेवण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. 2009 मध्ये आघाडी म्हणून लढताना कॉंग्रेस 174 तर राष्ट्रवादीने 114 जागा लढवल्या होत्या. तर उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडल्या होत्या. तर 2014 मध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.