औरंगाबाद – कॉंग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचे सुतोवाच केले आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आपण राहणार असल्याचे अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले आहे. अब्दुल सत्तार हे कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर येथे आले असताना हे वक्तव्य केले आहे. तसेच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून लवकरच मंत्रीपद दिले जाणार असल्याचे सत्तार यांनी सांगितले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमधून आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कॉंग्रेसला एकामागून एक धक्के बसताना दिसत आहेत. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मुलगा सुजय विखे-पाटील यांना निवडून आणण्याकरिता नगरमध्ये भाजपचा उघड उघड प्रचार केला. आता ते स्वःत भाजपात प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
राधाकृष्ण विखे-पाटील यांचे समर्थक अब्दुल सत्तार यांनीही आपण राधाकृष्ण विखे-पाटील जो निर्णय घेतील त्या सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे अब्दुल सत्तार हे बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर गावात एका खासगी कार्यक्रमासाठी आले होते. याप्रसंगी राधाकृष्ण विखे-पाटीलही त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यामुळे राज्यात कॉंग्रेसची चिंता वाढली आहे.
येत्या काही महिन्यात विधानसभेची निवडणूक आहे. देशात लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अपयशामुळे कॉंग्रेसच्या नेत्यांमध्ये चिंता वाढली आहे. अब्दुल सत्तार कॉंग्रेस सोडून गेले तर कॉंग्रेससाठी मोठा धक्का असेल.