कोलकता – पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना विरोधकांच्या प्रस्तावित आघाडीपासून दूर ठेवले जावे, अशी भूमिका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अधिररंजन चौधरी यांनी बुधवारी मांडली. तर, भाजपविरोधात राजकीय लढा देणे कॉंग्रेसला जमत नसेल; तर आम्ही ते काम करू, असे वक्तव्य ममतांचे भाचे आणि तृणमूल कॉंग्रेसचे तरूण नेते अभिषेक बॅनर्जी यांनी केले.
त्यामुळे विरोधकांचे ऐक्य घडण्याआधीच कॉंग्रेस आणि तृणमूलमधील संबंध ताणले गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे.भाजपविरोधात ताकदीने लढण्यासाठी विरोधकांचे ऐक्य घडवण्याच्या उद्देशातून कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि ममता सरसावल्याचे मागील काळात दिसून आले. ममतांनी दोन महिन्यांपूर्वी दिल्लीचा दौरा केला. त्यावेळी त्यांनी सोनिया आणि राहुल गांधी यांची भेट घेतली.
त्यामुळे विरोधकांचे ऐक्य घडवण्याचे प्रयत्न योग्य दिशेने आणि वेगाने सुरू असल्याचे मानले गेले. मात्र, एका घडामोडीनंतर कॉंग्रेस आणि तृणमूलमधील वाढत्या जवळिकीला हादरे बसू लागले. ती घडामोड म्हणजे तृणमूलच्या मुखपत्रात काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेला लेख. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राजकीय शह देण्यासाठी विरोधकांचा चेहरा राहुल नव्हे; तर ममता असतील, अशी भूमिका त्या लेखातून मांडण्यात आली. तेव्हापासून कॉंग्रेस आणि तृणमूलमध्ये शाब्दिक युद्ध रंगू लागले आहे.
अशातच बंगालचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष चौधरी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ममतांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ममता विश्वसनीय नाहीत. विरोधकांच्या ऐक्याला दगाफटका करून त्या भाजपची मदत करू पाहत आहेत. कॉंग्रेसला नुकसान पोहचवून राष्ट्रीय स्तरावर विस्तारण्याचा प्रयत्न तृणमूल करत आहे, अशा आरोपांची सरबत्ती त्यांनी केली. सुष्मिता देव आणि लुईझिनो फालेरो या नेत्यांनी कॉंग्रेसला रामराम ठोकून तृणमूलमध्ये प्रवेश केला. त्याची पार्श्वभूमीवर चौधरी यांनी केलेल्या टीकेला आहे.
दरम्यान, अभिषेक यांनी बुधवारी पुन्हा कॉंग्रेसवर निशाणा साधला. भाजपविरोधात लढण्यासाठी कॉंग्रेसने रस्त्यावर उतरावे. त्या पक्षाने आरामखुर्चीचे आणि सोशल मीडियाचे राजकारण सोडून द्यावे, असे त्यांनी म्हटले. भाजपविरोधात विश्वासार्ह लढा देण्यात कॉंग्रेसला अपयश येत असल्याची टीका अभिषेक यांनी याआधी केली होती. आता त्यांनी नव्या वक्तव्यातून कॉंग्रेसला आणखी डिवचल्याचे मानले जात आहे. त्यातून दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण होण्याची चिन्हे बळावली आहेत.