पासीघाट, (अरूणाचलप्रदेश) – कॉंग्रेसचा काल प्रकाशित करण्यात आलेला निवडणूक जाहीरनामा म्हणजे ढोंगीपणाचेच प्रचार पत्र असून त्यात त्यांनी केवळ खोटेपणा केलेला आहे असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. अरूणाचल प्रदेशात त्यांची या आठवड्यातील दुसरी प्रचार सभा झाली त्यावेळी ते बोलत होते.
कॉंग्रेसने आधीच्या जाहीरनाम्यातील कोणती आश्वासने पुर्ण केली असा सवाल मोदी यांनी केला. ते म्हणाले की 2004 च्या जाहींरनाम्यात त्यांनी सन 2009 पर्यंत प्रत्येक घरात वीज पोहोचवण्याचे आश्वासन दिले होते. पण सन 2014 सालीही देशातील अठरा हजार घरांमध्ये वीज नव्हती, त्यांचा जाहींरनामा हा त्यांच्या सारखाच भ्रष्ट आहे, खोट्या दाव्यांनी भरलेला आहे. हे निवडणूक घोषणापत्र नाही तर दंभ पत्र आहे असा आरोपही त्यांनी केला.
भाजप काय शेतकऱ्यांबरोबर राहीली पण कॉंग्रेसने मात्र शेतकऱ्यांची कायमच फसवणूक केली असल्याचा दावाही त्यांनी केला. आगामी निवडणूक ही विश्वास विरूद्ध भ्रष्टाचार आणि निर्धार विरूद्ध कटकारस्थान अशी आहे. त्यातून योग्य निवड मतदारांना करायची आहे.