अहमदाबाद – महाराष्ट्राप्रमाणेच गुजरातमध्येही अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका सुरु आहेत. त्यापैकी अमहमदाबाद महानगरपालिका निवडणुकीची चर्चा देशभरात होत आहे. कारण येथील नारायणपुराची जागा मागासवर्गीय महिलेला आरक्षित असतानासुद्धा येथे कॉंग्रेसने सामान्य प्रवर्गातील महिलेला तिकीट दिले.
यामुळे अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी या महिलेने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. या प्रकारामुळे येथील स्थानिक नेत्यांना ही जागा नेमकी कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, याची कल्पना नव्हती का?, असा प्रश्न विचारला जात आहे.
कॉंग्रेसच्या या महिला उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेण्यापूर्वी आम आदमी पार्टीच्या उमेदवाराचाही अर्ज रद्दबातल झालेला आहे. परिणामी तगडा प्रतिस्पर्धीच नसल्यामुळे नारायणपुराची जागा भाजपच जिंकणार असल्याचे जवळ-जवळ निश्चित झाले आहे.
या सर्व प्रकारामुळे येथील स्थानिक कॉंग्रेस नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले जात आहेत. तसेच, येथील कॉंग्रेस नेत्यांच्या अनभिज्ञतेमुळे आश्चर्यही व्यक्त केले जात आहे. या प्रकरानंतर यापुढे फक्त निष्ठावान कार्यकर्त्यांनाच तिकीट दिले जाईल, अशी भूमिका कॉंग्रेसने घेतली आहे.
या प्रकारामुळे एमआयएमचे नेते शमशाद पठाण यांनी येथे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि कॉंग्रेसने युती केल्याचा आरोप केला आहे. तसेच, येथे प्रत्यक्ष निवडणूक होण्याआधीच भाजपचे उमेदवार विजयी म्हणून घोषित केले जात आहेत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.
दरम्यान यापूर्वी सरदारनगर आणि ठक्करबापा या दोन वॉर्डमध्ये येथील कांग्रेसच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. त्यामुळे अहमदाबादमधील पालिका निवडणुकीत प्रत्यक्ष निवडणूक होण्यापूर्वी एकूण 192 जागांपैकी 3 जागा कॉंग्रेसला गमवाव्या लागल्या आहेत.