चंडीगढ – हरियाणा सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली कॉंग्रेसने सुरू केल्या आहेत. त्यासाठी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्याचा प्रस्ताव पक्षाला द्यायचा आहे. मात्र, राज्यपालांच्या भेटीची वेळ मिळत नसल्याचा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे.
केंद्रीय कृषी कायद्यांना होणाऱ्या विरोधामुळे हरियाणातील राजकारणही ढवळून निघाले आहे. त्या राज्यातील सातपैकी दोन अपक्ष आमदारांनी भाजप-जेजेपी युती सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. एवढेच नव्हे तर, जेजेपीचे काही आमदार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांचे समर्थन करत आहेत. त्याचा आधार घेऊन कॉंग्रेसने हरियाणा सरकारला घेरण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
सरकारने जनतेबरोबरच आमदारांचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्याची तयारी कॉंग्रेसने चालवली आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक गुरूवारी झाली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते भुपिंदरसिंह हुडा यांची पत्रकार परिषद झाली. त्यामध्ये त्यांनी अनेकदा प्रयत्न करूनही राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची भेट मिळत नसल्याचा दावा केला.
हरियाणा सरकार विशेष अधिवेशन बोलावण्यास तयार होणार नाही. त्यामुळे राज्यपालांनी घटनात्मक अधिकारांचा वापर करून विशेष अधिवेशन बोलवावे यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील असल्याचेही हुडा यांनी म्हटले.