मुंबई – रिझर्व्ह बँकेने मोठा निर्णय घेत 2000 रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. निवेदनानुसार या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत वैध राहतील. बँकेच्या या निर्णयानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. ज्येष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, आमच्या स्वयंभू विश्वगुरूनी विध्वंसक ‘तुघलकी फर्मान’ काढून धूमधडाक्यात २००० रुपयांची नोट चलनात आणली होती. आता ती बाद करण्यात येत आहे. स्वयंघोषित विश्वगुरुंच्या ‘आधी कृती, नंतर विचार’ या धोरणाचा हा परिणाम आहे.’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.
दरम्यान, रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे सांगितले आहे की,’2000 रुपयांच्या नोटा वैध राहतील, आणि इतर मूल्यांच्या नोटांसाठी सहज बदलता येतील. त्यासाठी तारीखही निश्चित करण्यात आली आहे. पण तरीही २००० रुपयांच्या नोटेबाबत अनेक प्रश्न लोकांच्या मनात घर करत आहेत. यातील एक म्हणजे ज्यांचे बँक खाते नाही, ते 2000 रुपयांची नोट बदलून कशी घेणार?’
देवाणघेवाण सहज करता येते आरबीआयने म्हटले आहे की, 2000 रुपयांच्या नोटा 30 सप्टेंबरपर्यंत चलनात राहतील. म्हणजेच ज्यांच्याकडे सध्या 2000 रुपयांच्या नोटा आहेत, त्यांना त्या बँकेतून बदलून घ्याव्या लागतील. त्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबरपर्यंतचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ देणे बंद करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच बँका आता ग्राहकांना 2000 च्या नव्या नोटा देणार नाहीत.’
नोटा बदलण्यासाठी बँक खाते आवश्यक आहे का?
आता प्रश्न असा आहे की, ज्या बँकेत त्याचे खाते आहे त्याच बँकेतून कोणताही ग्राहक 2000 रुपयांची नोट बदलू शकतो का?
रिझर्व्ह बँकेने स्पष्टपणे म्हटले आहे की, देशातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून कोणतीही व्यक्ती एकावेळी 2000 रुपयांच्या मर्यादेपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा बदलू शकते. म्हणजेच बँकेत खाते असणे आवश्यक नाही. नोटा बदलण्याची सुविधा मोफत असेल असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे.