बेंगळुरू – बेंगळुरूमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या हत्येमागे कॉंग्रेसचा हात असल्याचा आरोप भाजपचे आमदार एम. के. रेणुकाचार्य यांनी केला आहे. या प्रकरणाचा तपास सरकारने “एनआयए’कडे सोपवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्षा याच्या हत्येमागे डी. के. शिवकुमार, बी. के. हरीप्रसाद आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांचा हात असल्याचा आरोप रेणुकाचार्य यांनी केला आहे.
या कार्यकर्त्याच्या कुटुंबीयांना आपण 5 लाख रुपयांची भरपाई देणार आहोत. या हत्येला जबाबदार असलेल्या लोकांना तत्काळ शिक्षा व्हायला पाहिजे. यापूर्वीही या कार्यकर्त्याच्या हत्येचा प्रयत्न होऊन गेला होता. मात्र, हर्षा याला संरक्षण देण्यास पोलीस अपयशी ठरले. या संदर्भात “सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया’ आणि “पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या संघटनांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणीही रेणुकाचार्य यांनी केली आहे.
या घटनेचा हिजाब वादाशीही संबंध जोडला जात आहे. तपासादरम्यान असे आढळून आले की हर्षाने नुकतीच त्याच्या फेसबुक हिजाबच्या विरोधात आणि भगव्या शालीच्या समर्थनार्थ एक पोस्ट लिहिली होती. त्यामधून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.