मुंबई – राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन पक्षांचे आघाडी सरकार आहे. महाविकास आघाडी म्हणून कार्यरत असलेल्या या सरकारमध्ये कॉंग्रेसला योग्य न्याय मिळत नसल्याची तक्रार सुरूवातीपासूनच होत आहे. मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी याबाबत खुलासा करत तसे काही नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते.
एकदा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही जाहीर नाराजी व्यक्त केली होती, तर आता अलिकडेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही यावर भाष्य केले होते. असे असतानाच आता मुंबई कॉंग्रेसच्या एका नेत्याने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवून याच आरोपांचा पुनरूच्चार केला आहे.
राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच सरकार चालवत असल्याचे दिसून येते. कॉंग्रेसच्या नेत्यांना अर्थात मंत्र्यांना ग्राउंड लेव्हलला काम करण्याची संधीच मिळत नसून सर्वसामान्यांनाच काय, कार्यकर्त्यांनाही आपल्या पक्षाच्या मंत्र्यांकडे कुठली खाती आहेत याची माहिती नाही असे या पत्रात म्हटले आहे.
पत्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसबद्दल विशेष रोष व्यक्त करणारी टिप्पणी करण्यात आली आहे. हा पक्ष कॉंग्रेस संघटनेला वाळवीसारखा पोखरत असून आपली ताकद वाढवत चालला असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. पक्षाने महाराष्ट्रातील जनतेला बरीच आश्वासने दिली आहेत. मात्र त्या दिशेने कोणतेही काम राज्यात होत नसल्याचे निदर्शनास येत आहे. सर्वप्रथम पक्षातून होणारी गळती रोखण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.