नवी दिल्ली – औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यात यावे यासाठी शिवसेनेच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, या निर्णयाला काॅंग्रेसकडून विरोध करण्यात येत आहे. काॅंग्रेस नेते संजय निरूपम यांनी औरंगाबाद नामांतराच्या विषयावरून शिवसेनेला इशारा दिला आहे.
“औरंगाबादचे नामांतर हा शिवसेनेचा जुना अजेंडा आहे. मात्र, सरकार तीन पक्षाचे आहे हे शिवसेनेने विसरू नये. आघाडीचे सरकार हे काॅमन मिनिमम प्रोग्रामवर चालते. कोणत्या वयक्तिक अजेंड्यावर नाही. काॅमन मिनिमम प्रोग्राम हा काम करण्यासाठी आहे, नाव बदलण्यासाठी नाही,” असे निरूपम यांनी ट्विट करून म्हटले आहे.
औरंगाबाद का नामांतरण शिवसेना का अपनी पुराना एजेंडा है।
लेकिन सरकार तीन पार्टियों की है, यह नहीं भूलना चाहिए।
गठबंधन की सरकारें कॉमन मिनिमम प्रोग्राम से चलती हैं।
किसी के पर्सनल एजेंडे से नहीं।
प्रोग्राम काम करने के लिए बना है,नाम बदलने के लिए नहीं।#Aurangabad— Sanjay Nirupam (@sanjaynirupam) January 2, 2021
“औरंगजेबचे व्यक्तित्व वादग्रस्त राहिले आहे. त्याच्या प्रत्येक बाबींशी काॅंग्रेस सहमत असेल हे गरजेचे नाही. छत्रपती संभाजी महाराज हे एक महान योद्धा होते. त्यांचं जीवनकार्य वंदनीय आहे यावर कोणतेही मतभेद नाही. मात्र, सरकार चालवत असताना शिवसेना महपुरूषांना मध्ये आणत राहिली तर नक्कीच गोत्यात येईल. त्यांनी स्वत:च ठरवावे,” असेही निरूपम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, याआधीच काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आमचा नामांतरला विरोध राहिल, असे सांगितले आहे. महाविकास आघाडीत काॅमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला असल्याने जेव्हा नाव बदलासंदर्भात प्रस्ताव येईल, तेव्हा आमचा विरोधा राहील. पण अद्याप तसा कोणताही प्रस्ताव समोर नसल्याचेही थोरात यांनी स्पष्ट केले होते.
राज्यघटनेची शपथ घेऊन सत्तेत आलो आहोत. त्यामुळे त्या शपथेची प्रताडना होईल अशी कुठलीच गोष्ट आम्हाला मान्य नाही. सामाजिक मतभेदाला आमच्याकडे स्थान नाही, औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच राहिल, असेही थोरात यांनी ठामपणे सांगितले होते.