मुंबई – मुंबई महापालिकेच्या निवडणुका २०२२ मध्ये होणार असल्या तरी यावरून राजकीय वातावरण आतापासूनच तापायला सुरुवात झाली आहे. अशातच आज मुंबई महापालिकेतील विरोधीपक्ष नेते रवी राजा यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महापालिका निवडणुकांबाबत बोलताना काँग्रेस नेते रवी राजा यांनी, ‘सन २०२२ मध्ये होणारी मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवेल, यासाठी शिवसेनेशी आघाडीची गरज नाही’ असं खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
Congress to fight BMC elections alone. No need for an alliance with Shiv Sena: Ravi Raja, Congress leader, #Mumbai
— ANI (@ANI) November 19, 2020
विशेष म्हणजे रवी राजा यांची ही भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेविरोधात असून यापूर्वी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस मुंबई महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी म्हणूनच लढवेल असे संकेत दिले होते. रवी राजा यांच्या या वक्तव्यामुळे आता येत्या काळात राज्यात होणाऱ्या निवडणूका महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष एकत्र येऊन लढवतात की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मुंबई महापालिकेतील काँग्रेसमध्ये शिवसेनेबद्दल काहीशी नाराजी असल्याचं चित्र आहे. यामागे, राज्यात महाविकास आघाडीप्रमाणे महापालिकेत शिवसेनेसोबत आघाडी होऊ शकलेली नाही हे कारण आहे. स्थायीसह इतर समित्यांच्या निवडणुकीत काँग्रेसने शिवसेनेविरोधात लढत दिली होती. मात्र, यात काँग्रेसने माघार घेतल्याने शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते.
फडणवीसांचे मिशन मुंबई
दरम्यान, २०२०२मध्ये होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी आतापासूनच तयारी सुरु केल्याचं दिसतंय. नुकतेच त्यांनी मुंबई भाजपाच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना मुंबई महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार असा विश्वास कार्यकर्त्यांना दिला होता. मात्र, काँग्रेस नेत्याच्या या वक्तव्यामुळे आता शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि मनसे काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.