नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांना अखेर जामीन मिळाला. राजा पाटोरिया यांनी एका सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येविषयी वक्तव्य केले होते. त्यानुसार त्यांना अटककरण्यात आली होती. अखेर त्यांना जामीन मिळाला आहे.
दरम्यान, राजा पटेरिया यांनी तुरुंगातून बाहेर येताच आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आपल्या हितचिंतकांना सावधान पण केले आहे. राजा पटेरिया यांनी आपल्या कुटुंबातील सदस्य आणि हितचिंतकांना सावध करताना सांगितले की, यापुढे कोणतेही विधान करताना काळजी घ्या. असे काही बोलू नका, ज्यामुळे तुम्हाला संकटाचा सामना करावा लागेल.
राजा पटेरिया यांचा मागच्या वर्षी १३ डिसेंबर रोजी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये ते पवई नावाच्या गावात बैठकीत बोलत असल्याचे दिसत होते. या बैठकीत ते म्हणाले, “मोदी निवडणूक प्रक्रिया संपवून टाकतील. ते धर्म, जाती, भाषा याआधारावर विभागणी करतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे भविष्य धोक्यात येईल. संविधान वाचवायचे असेल तर मोदींची हत्या करण्यासाठी तयार राहा. हत्या म्हणजेच मोदींचा पराभव करा…”
काँग्रेसचे नेते राजा पटेरिया यांना मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने ४ मार्च रोजी जामिनावर मुक्त केले. पोलिसांनी सांगितले की, त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे. आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर झाला. एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना पटेरिया म्हणाले, “मी न्यायव्यवस्थेचा आदर करतो. न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करून मला तुरुंगात धाडणाऱ्या भाजपाच्या राज्य सरकारचा मी निषेध करतो. न्यायव्यवस्था दोषी नसून भाजपा दोषी आहे.”
आपल्या वादग्रस्त विधानावर सविस्तर भूमिका मांडताना पटेरिया म्हणाले, “मी महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे अनुसरण करतो, म्हणून भाजपा मला शांत करण्याचा प्रयत्न करत आहे. मी जातिव्यवस्थेच्या विरोधात आहे. भाजपा पक्ष गोडसे, सावरकर आणि गोळवलकर यांच्या तत्त्वांना मानणारा आहे. मी संविधान आणि देशातील आदिवासी, दलित आणि अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करण्याबाबत बोललो होतो.”
भाजपावर हल्ला करताना पटेरिया म्हणाले की, माझ्यासारख्या अनेक लोकांना तुरुंगात डांबले आहे. माझा प्रश्न आहे भाजपाला. त्यांचे नेते खुलेआम हिंदू राष्ट्र करण्याबाबत विधान करतात. त्यांना का नाही अटक केली जात. हे असंवधानिक नाही का? हे लोक धर्माचा गैरवापर करतात आणि साधूंद्वारे वादग्रस्त वक्तव्य करतात. पण त्यांच्यावर कोणतीही कारवाई का होत नाही? मी शिवराज सरकारच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करत असल्यामुळे माझ्यावर सरकार नाराज आहे. मला घाबरविण्यासाठी त्यांनी तुरुंगात पाठविले, असा आरोप पटेरिया यांनी केला.